‘याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले होते. त्यांनी नंतर काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे कौतुक केले आहे. या घटनाक्रमाला मी गांभीर्याने घेतो,’ असे राजस्थानमधील काँग्रेसचे नेते सचिन पायलट म्हणाले आहेत. पायलट यांच्या या विधानामुळे राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आल्याचे म्हटले जात आहे. नव्याने पक्षाध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘देवाची करणी की निष्काळजीपणा,’ मोरबी पूल दुर्घटनेवरून गुजरात सरकार, नरेंद्र मोदींवर टीका; काँग्रेस आक्रमक

सचिन पायलट काय म्हणाले?

सचिन पायलट यांची मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. याच इच्छेमुळे काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राजस्थान काँग्रेसमधील वातावरण शांत होते. मात्र महिन्याभरानंतर आता पायलट पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी अप्रत्यक्षपणे अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मला वाटतं हा फार महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं ही बाब विशेष आहे. ही घटना आपण सहजपणे घ्यायला नको”, असं सचिन पायलट म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Himachal Pradesh Election : हिमाचलमध्ये भाजपाप्रमाणे काँग्रेससमोरही अंतर्गत बंडाळीचं संकट; फटका बसणार की प्रियंका गांधींची जादू चालणार?

तीन नेत्यांवर कारवाई कधी होणार?

गेहलोत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत सचिन पायलट यांनी २५ सप्टेंबर रोजी काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या काँग्रेसच्या तीन नेत्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते. त्यामुळे राजस्थानचा नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी तसेच मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य नावांची चर्चा करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला अशोक गेहलोत यांचे समर्थक आमदार गैरहजर राहिले होते. तसेच बैठकीला उपस्थित न राहता त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे आमदारकीचे राजीनामे पाठवले होते. याच कारणामुळे पक्षादेश मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या तीन नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या तीन नेत्यांना काँग्रेसतर्फे नोटीस जारी करण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>> “सत्तेत येऊ अन्यथा विरोधी बाकावर, मात्र…” हिमाचल प्रदेश निवडणुकीवर आप पक्षाने भूमिका केली स्पष्ट

सचिन पायलट आक्रमक होण्यामागचं कारण काय?

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साधारण १ वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे पायलट यांना स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. सचिन पायलट तरूण आहेत, याच कारणामुळे राज्यातील काँग्रेसचे तसेच राज्याचे चित्र बदलायचे असेल तर मागील ३० वर्षांपासून चालत आलेले चित्र बदलावे लागेल, असे मत पायलट समर्थकांचे आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकीसाठीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मीच असेल, असे ठसवण्याचा प्रयत्न गेहोलत यांच्याकडून केला जातोय. याचाच एक भाग म्हणून १७ ऑक्टोबर रोजी अनुभवाला दुसरा पर्याय नाही. तरुणांनी धीर धरावा आणि त्यांची वेळ येण्याची वाट पाहावी, असे सूचक विधान त्यांनी केले होते. याच कारणामुळे सचिन पायलट आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.

हेही वाचा >>>अशोक गेहलोतही गुलाम नबी आझादांच्या मार्गावर? सचिन पायलट यांचं सूचक विधान, मोदींच्या ‘त्या’ विधानाचा दिला संदर्भ!

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्याने विराजमान झालेले मल्लिकार्जुन खरगे यांच्यापुढे पक्षफुटी न होऊ देता या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे आव्हान असेल. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार, हे देखील त्यांना ठरवावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan congress clash sachin pilot criticizes ashok gehlot how mallikarjun kharge will solve problem prd
First published on: 02-11-2022 at 21:03 IST