scorecardresearch

रामचरितमानसवरून पुन्हा एकदा JDU-RJD आमनेसामने; जेडीयूचा नेता म्हणाला, “आता कुराण आणि बायबल…”

आरजेडी पक्षाचे नेते, शालेय शिक्षणमंत्री यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत रामचरितमानसच्या प्रती आणल्यानंतर बिहारमध्ये सत्ताधारी पक्षातच पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

ramcharitmanas raw in bihar jdu and rjd clashesh
रामचरितमानस वरून सुरु झालेला वाद अजूनही शमला नाही. जेडीयू आणि आरजेडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

बिहारमधील सत्ताधारी पक्ष जनता दल (युनायटेड) (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा सार्वजनिक झाला आहे आणि पुन्हा एकदा शालेय शिक्षणमंत्री चंद्रशेखर वादाच्या केंद्रस्थानी आहेत. आरजेडी पक्षाचे नेते असलेल्या चंद्रशेखर यांनी जानेवारी महिन्यात रामचरितमानस ग्रंथावरून केलेल्या टिप्पणीमुळे सत्ताधारी पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. या विषयाचे पडसाद बाजूच्या उत्तर प्रदेश राज्यातही उमटले. चंद्रशेखर यांनी मंगळवारी विधानसभेत रामचरितमानस आणि रामायनच्या प्रती आणल्या. तसेच विधानपरिषदेत देखील त्यांनी या प्रती नेऊन रामचरितमानसवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण सत्ताधारी पक्षातील जेडीयूच्या आमदारांनी त्यांना बोलू दिले नाही.

जेडीयूचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे आमदार नीरज कुमार इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले की, शिक्षण मंत्र्यांना नेमके काय सांगायचे आहे? हेच मला समजत नाही. त्यांनी रामचरितमानसमधील काही ओळी उद्धृत केल्या. जसे की, ढोल, गवाँर, शुद्र, पशू, नारी वगैरे. मी देखील कुराण आणि बायबलमधून वादग्रस्त ओळी वाचून दाखवू शकतो. मी आरजेडी पक्षातील आमच्या सहकाऱ्याला विचारू इच्छितो की, आपला देश संविधानावर चालतो की रामचरितमानसवर किंवा आणखी कोणत्या धार्मिक ग्रंथावर? नीरज कुमार पुढे म्हणाले की, आरजेडीने आपल्या मंत्र्याला अप्रासंगिक विषय उचलून धरण्याबाबत समज दिली पाहीजे. हे चुकीचे आहे. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या धार्मिक ग्रंथावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.

हे वाचा >> रामचरितमानस वादात मायावतींची उडी, म्हणाल्या, “संविधान हाच उपेक्षितांचा ग्रंथ”, गेस्ट हाऊस प्रकरणावरून अखिलेश यादवांना टोला

नीरज कुमार यांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, रामचरितमानसवर मी जे काही बोललो त्यावरून देशभरात वाद सुरू झाला. डॉ. राममनोहर लोहिया यांनी रामचरितमानसला रत्नजडित आणि टाकाऊ अशी दोन्ही विशेषणे दिली होती. याचाही मी अनेकदा उल्लेख केलेला आहे. मला वाटते रामचरितमानसची पुन्हा एकदा उजळणी करणे आवश्यक आहे.

दुसऱ्या बाजूला आरजेडीचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी मात्र शिक्षणमंत्र्यांची बाजू उचलून धरली. ते म्हणाले, जेडीयू चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर अतिरेकी प्रतिक्रिया का देत आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीदेखील रामचरितमानस आणि रामायनमधील वादग्रस्त ओळी बोलून दाखविलेल्या आहेत. वादग्रस्त मजकूरावर चर्चा आणि वादविवाद घडल्यानंतर असा मजकूर तात्काळ काढून टाकला पाहीजे. जेडीयूचे नेते यांनी बायबल आणि कुराणमधील वादग्रस्त मजकूराबाबत विधान केल्याबद्दल विचारले असता मेहता म्हणाले की, आम्ही कुणालाही काही बोलण्यापासून रोखू इच्छित नाहीत. चंद्रशेखर यांनी रामचरितमानसचा विषय हातात घेतला, इतर लोक बाकीचे विषय हातात घेऊ शकतात.

हे वाचा >> ‘मनुस्मृती, रामचरितमानस हे द्वेष पसरविणारे ग्रंथ’, बिहारच्या मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद; हिंदू संघटनांकडून जीभ छाटण्यासाठी बशीस जाहीर

आरजेडी नेते मेहता यांनी भाजपाच्या आरोपाबाबत बोलताना सांगितले की, भाजपाला राज्यातील जातीय वातावरण ढवळून काढायचे आहे. त्यामुळेच ते रामचरितमानसचा विषय घेऊन आमच्यावर टीका करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले, आरजेडी आणि जेडीयू हे दोन पक्ष समाजाच्या राजकीय अज्ञानावर पोसले गेलेले पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर फोडा आणि राज्य करा, ही त्यांची नीती राहिलेली आहे. ते नेहमीच जातिवर आधारित विषयांना हवा देतात ज्यामुळे सामाजिक तणाव वाढून तेढ निर्माण होते. सध्याचा रामचरितमानस हा असाचा जाणूनबुजून निर्माण केलेला वाद आहे.

जानेवारी महिन्यात सदर वाद उफाळून आल्यानंतर आरजेडीने आपल्या मंत्र्याची बाजू उचलून धरली असली तरी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कोणतीही एक बाजू न घेता संयत भूमिका मांडली. ते म्हणाले की, आरजेडी पक्ष सर्व धर्माचा आदर करतो. पक्षाच्या कोणत्याही नेत्याने भाजपाच्या जाळ्यात अडकू नये. आमच्यासाठी संविधानच सर्वश्रूत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:47 IST