नागपूर : भाजपच्या दबावामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐनवेळी विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून काँग्रेसमधून आयात करावा लागलेला उमेदवार, काँग्रेसच्या उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द होण्यासाठी सरकारच्या पातळीवर झालेली चपळाई अशा नाट्यमय घडामोडींमुळे रामटेक (राखीव) मतदारसंघातील लढतीची सारी समीकरणेच बदलून गेली आहेत. पक्षफुटीमुळे खिळखिळी झालेली संघटना, उमेदवार आयात केल्याने शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी अशा स्थितीत शिवसेनेपुढे रामटेकचा बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐनवेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने उमेदवारी बाद झाल्याने काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना मिळत असलेली सहानुभूती, त्याचा त्यांचे पती व काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना होणारा फायदा आणि विद्यमान केंद्र सरकार विरुद्ध असलेली नाराजी या आधारावर यंदा रामटेकच्या गडावर तिरंगा फडकवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. वंचित आणि बसपाच्या उमेदवारामुळे होणारे मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते हे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

नागपूर जिल्ह्यातील नागपूर इतकाच अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता. पक्षफुटीमुळे तो कमी झाला. कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर विद्यमान खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशीष जयस्वाल यांच्यासह दुसरा गट शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे. भाजपने हा मतदारसंघ पदरी पाडून घेण्याचे प्रयत्न केले. पण शिंदे यांनी ते यशस्वी होऊ दिले नाही, पण भाजपने दिलेले राजू पारवे हे उमेदवार त्यांना स्वीकारावे लागले. काँग्रेसमधून आलेल्या पारवेंसाठी विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसैनिक नाराज आहेत. त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न शिंदे करीत आहे. त्याचा फायदा पारवे यांना किती होतो हे पाहावे लागणार आहे. मात्र शिंदेच्या पाठीमागे भाजपने पूर्ण शक्ती उभी केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघात घेण्यात आली. त्यामुळे भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केल्याचे स्पष्ट होते. वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारी हे मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

रामटेक हा वास्तविक शिवसेनेचा बालेकिल्ला. पण महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. यामुळेच ठाकरे गटासोबत असलेल्या कार्यकर्त्यांची भूमिका कशी असेल, त्याची मदत शिंदे गटाला होते का, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

हेही वाचा – मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

काँग्रेसचा दावा

दुसरीकडे काँग्रेसला सुरुवातीपासूनच या मतदारसंघात अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक व जि.प.च्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित झाल्यापासून त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला गेला. याबाबत केलेल्या तक्रारीची सरकारने तत्परतेने दखल घेऊन प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्वाळा पडताळणी समितीने दिला. त्याचा आधार घेऊन बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसला उमेदवार बदलावा लागला. बर्वे यांच्याबाबत एकामागून एक घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना मतदारांमध्ये विशेषत: महिलांमध्ये निर्माण झाली. एका महिलेला जाणीवपूर्वक निवडणूक रिंगणातून बाद करण्यात आल्याचा बर्वे यांनी केलेला आरोप, त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करणारा ठरला. याचा फायदा त्यांचे पती व काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना होतो का, हे महत्त्वाचे ठरेल. सुनील केदार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांचे उत्तम जा‌ळे आहे. त्याच्याच गटाकडे जिल्हा परिषदेत सत्ता आहे. काँग्रेसचे सर्व गट व नेते यावेळी त्यांच्यासोबत आहेत. याशिवाय ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या गटासोबत असल्याने त्यांच्या आधारावर काँग्रेसने हा रामटेकचा गड पुन्हा सर करण्याचा दावा केला आहे. मात्र काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनी केलेली बंडखोरी, त्यांना वंचितने दिलेला पाठिंबा आणि रिंगणात असलेले बसपाचे संदीप मेश्राम यांची उमेदवारी काँग्रेसच्या अडचणीत वाढ करणारी ठरू शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramtek lok sabha elections who benefits from changing political equations due to dramatic developments print politics news ssb