लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली जालना नगरपरिषद आणि जालना विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असावा यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नियोजनास सुरुवात केली आहे. जालना विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात पक्षाचे जाळे वाढविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

जालना नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व स्थापित करण्याच्या उद्देशाने दानवे यांनी अलीकडेच संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली.

या विधानसभा मतदारसंघातील जवळपास ७० टक्के मतदार जालना शहरात तर ३० टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत. विधानसभेत भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यासाठी जालना शहरातील मतदारही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातही जालना नगरपरिषद महत्त्वाची आहे. त्यामुळे दानवे यांनी नगरपरिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा … सांगलीत शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्येही राष्ट्रवादीविरोधात अस्वस्थता

कै. व्यंकटेश गोरंट्याल यांचा अपवाद वगळता यापूर्वी एकदाही जालना नगरपरिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे आलेले नाही. १९८६ च्या सुमारास काँग्रेसचे वर्चस्व असतानाही जनता दल आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यावर ते नगराध्यक्षपदी निवडून आले होते. व्यंकटेश गोरंट्याल यांनी उणीपुरी तीन वर्षे नगराध्यक्षपदी काढल्यानंतर हे पद काँग्रेसकडे गेले. त्या काळात शिवसेना नगरपरिषदेच्या राजकारणात नव्हती.

१९९१ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेना नगरपरिषदेच्या राजकारणात उतरली. शिवसेना आणि भाजप युतीने ही निवडणूक लढविली. ६६ सदस्यांमध्ये शिवसेनेचे १६ आणि भाजपचे सात तर १५ अपक्ष सदस्य निवडून आले होते. युतीने लढविलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचा विजय झाला तर उपाध्यक्षपद भाजपकडे गेले. तेव्हापासून युतीमध्ये निवडणूक लढवून कायमच शिवसेना क्रमांक एकचा आणि भाजप क्रमांक दोनचा पक्ष राहिला आहे. १९९१ पासून शिवसेनेकडे सात वेळेस नगराध्यक्षपद आले आणि भाजपकडे उपाध्यक्षपद येत गेले.

हेही वाचा … आदिवासींना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्याचे शिवाजीराव मोघे यांच्यासमोर आ‌व्हान, अ. भा. आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

आगामी नगरपरिषद निवडणूक भाजपला पूर्ण ताकदीने लढवायची असून विकासाच्या मुद्द्यावर पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणायचा हे रावसाहेब दानवे यांनी आता पक्षाच्या बैठकीत जाहीर केले आहे. गेल्या सोमवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत दानवे यांनी राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने जालना शहरातील मतदार भाजपच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

मावळत्या लोकनिर्वाचित नगरपरिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे होते. ६१ सदस्यांमध्ये शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्हावर निवडून आलेले प्रत्येकी ११ सदस्य होते, तर काँग्रेसचे २८ तर राष्ट्रवादीचे ९ सदस्य होते. तर एक सदस्य अपक्ष होता. आगामी निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षांनीही पूर्वतयारी सुरू केलेली आहे. परंतु गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून भाजपने शहरातील विविध प्रभागांत कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. या दृष्टीने दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीस मतदान केंद्रप्रमुख, पदाधिकारी तसेच भास्कर दानवे, राजेश राऊत, अशोक पांगारकर यांच्यासह माजी नगरपरिषद सदस्य उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danve planning to take over jalna nagar parishad governed by congress print polics news asj
First published on: 14-07-2022 at 10:10 IST