लालू प्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सध्या बिहारमधील विविध राजकीय आघाड्यांवर आपले स्थान अधिक मजबूत करताना दिसत आहे. आरजेडीच्या नेतृवाची धुरा सध्या लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. २४३ सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेत आरजेडीच्या आमदारांची संख्या आता ८० झाली आहे. बुधवारी एमआयएमच्या एकूण पाच आमदारांपैकी चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला आहे. या चार आमदारांच्या प्रवेशामुळे ८० अमदरांसह आरजेडी राज्यातील हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.आता पूर्व बिहारमधील सीमांचल प्रदेशात प्रमुख विरोधी असणाऱ्या आरजेडीची ताकत वाढली आहे.

या मुद्द्यांवर बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की “२०२० च्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष बनण्याचा मान दिला होता. मात्र आमच्या तीन आमदारांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. परंतु आता आम्ही पुन्हा ८० जागांसह सभागृहात अग्रस्थान मिळवले आहे. आरजेडीने सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दिशेने दुहेरी रणनीती अवलंबली आहे.ज्यामध्ये त्यांनी जात जनगणनेसारख्या मुद्द्यांवर नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडी(यू) ला पाठिंबा दिला आहे.

बिहार विधानसभेच्या सध्याच्या पावसाळी अधिवेशनात अग्निपथ योजनेवर चर्चा व्हावी अशी मागणी लावून धरली. मात्र सभापती विनय कुमार सिन्हा यांनी ती मागणी मान्य न केल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज ठप्प केले. त्यांनी महत्त्वाचा असणारा प्रश्नोत्तराचा तासही व्यवस्थित चालू दिला नाही. त्यामुळे आतापर्यंत जेमतेम २० प्रश्न सभागृहात विचारले गेले असून शुक्रवारी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी आरजेडीच्या आमदारांनी  सभागृहाबाहेर प्रती सभागृह चालवले. प्रती सभागृहात आरजेडीने त्यांचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पूर्वे यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली. जेडीयू ने अग्निपथ योजनेला ठाम विरोध केला तरीही भाजपने नितीशसोबत शांत राहण्याचीच भूमिका घेतली आहे.