राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भारतीय लष्कराद्वारे राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केले आणि भारतीय सशस्त्र दलांनी पर्यटकांवर झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे योग्य प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले. रविवारी त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या नीरजा चौधरी यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत ते भारत आणि पाकिस्तानमधील तीव्र संघर्षापासून ते पहलगाम घटनेविरुद्ध जम्मू आणि काश्मीरमध्ये व्यक्त झालेल्या संतापापर्यंत विविध मुद्द्यांवर बोलले. शरद पवार हे देशातील सर्वांत अनुभवी राजकारण्यांपैकी एक आहेत. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय संरक्षणमंत्री होते. दोन दिवस चाललेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी त्यांच्या पक्षासमोरील पेचप्रसंग, विरोधी पक्ष इंडिया आघाडीची स्थिती आणि भविष्य, तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल भाष्य केले.
प्रश्न – पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हल्ल्यांकडे तुम्ही कसे पाहता?
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांविरुद्ध भारतीय सशस्त्र दलांनी उचललेल्या पावलांचे मी कौतुक करतो. हा अत्यंत आवश्यक धडा होता. भारतीय हवाई दलाने विशेष खबरदारी घेतली आणि त्यात कोणताही नागरिक जखमी झाला नाही. भारत सरकारने उचललेल्या पावलांवर मी खूप आनंदी आहे.
प्रश्न – तुम्ही संरक्षणमंत्री राहिले आहात. पहलगाम हल्ल्याबद्दल ऐकल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
माझी पहिली प्रतिक्रिया होती की, काहीतरी चूक झाल्याशिवाय इतकी मोठी घटना घडू शकली नसती. पण, ही प्रश्न विचारण्याची वेळ नाही. ही वेळ एकत्र काम करण्याची आणि भारत सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याची आहे.
प्रश्न – काश्मीरमधील लोक हल्ल्यांविरुद्ध निषेध करण्यासाठी बाहेर पडले. काश्मीरमधील दहशतवादाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. त्याकडे तुम्ही कसे पाहता?
स्थानिक लोकांनी दहशतवादविरोधात आक्रमक भूमिका घेतली. जम्मू-काश्मीर विधानसभेत हल्ल्याचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर झाला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेले भाषण खरोखर चांगले होते. तुम्हाला हे ठाऊक नसेल; पण मी मुख्यमंत्री असताना ओमर अब्दुल्ला तीन वर्षे आमच्या मुंबईतील घरी राहिले होते. ओमर अब्दुल्ला आणि सुप्रिया (शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे) एकत्र कॉलेजमध्ये जात असत. त्यावेळी काश्मीरमधील परिस्थिती वाईट होती. त्यावेळी फारुख अब्दुल्ला माझ्याकडे आले आणि म्हणाले, “मी ओमरला तुमच्याकडे पाठवत आहे.”
प्रश्न – तुम्ही आता संरक्षणमंत्री असता, तर तुमचा पंतप्रधानांना काय सल्ला असता?
देशात असे अनेक मोठे वर्ग आहेत, जे कारवाई करण्याचा आग्रह धरत आहेत. तुम्हाला कोणतीही कारवाई करायची असेल, तर घाई करू नका. सरकारने जे केले आहे, जसे की आयात-निर्यात थांबवणे, ते सर्व योग्य आहे. जर मी पदावर असतो, तर मी योग्य ती कारवाई केली असती. धडा शिकवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. उदाहरणार्थ- पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तळ.
प्रश्न – तुम्हाला वाटते का भारताने त्यांच्या सैन्यापेक्षा पाकिस्तानच्या राजकारण्यांशी संपर्क साधावा?
त्यासाठीची ही वेळ नाही.
प्रश्न – दुसऱ्या विषयाकडे वळूया. जर नितीश कुमार गेल्या वर्षी एनडीएमध्ये परतले नसते, तर इंडिया आघाडी २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकली असती, असे तुम्हाला वाटते का?
जर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारखे मित्र इंडिया आघाडीबरोबर असते, तर परिस्थिती खूप वेगळी असती.
प्रश्न – तुम्हाला यश मिळाले असते का?
मी ते सांगू शकत नाही. पण जर तुम्ही भाजपाला मिळालेले आणि विरोधकांना मिळालेले आकडे पाहिले तर, आम्ही विजयाच्या जवळ पोहोचलो होतो.
प्रश्न – तुम्ही नितीश कुमार यांना तुमच्याबरोबर का ठेवू शकला नाहीत?
इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. ही बैठक नितीश कुमार यांनी आयोजित केली होती. दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली. तोवर नितीश कुमार आमच्याबरोबर होते; मात्र अचानक त्यांनी निर्णय बदलला.
प्रश्न – बंगळुरूमध्ये असे म्हटले जात होते की, इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून नितीश यांचे नाव जाहीर केले जाणार आहे?
लालू प्रसाद यांनी नितीश कुमार यांचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला. प्रत्यक्षात लालू प्रसाद यादव यांनी पुढाकार घेतला. माझ्यासह आमच्यापैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला. बंगळुरूच्या बैठकीत यावर चर्चा झाली. पण, काही लोक म्हणाले, “घाईने निर्णय घेऊ नका”.
प्रश्न – नकार देणाऱ्यांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश होता का?
काही लोक म्हणाले की, आम्ही दक्षिणेतील लोकांशी बोलू, त्यांना विश्वासात घेऊ आणि नंतर निर्णय घेऊ. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तिथे होते; परंतु राहुल तिथे होते की नाही हे मला आठवत नाही.
प्रश्न – तुम्हाला असे वाटते का की, विरोधी पक्षनेते म्हणून गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना मिळालेली संधी वाया घालवली?
संधी सोडली जात नाही. संधी आजही आहे. चुका होऊ शकतात, चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आजही जर विवेकबुद्धीने काम केले गेले, तर त्या संधी परत येऊ शकतात.
प्रश्न – गेल्या वर्षी लोकसभा प्रचारादरम्यान तुम्ही साताऱ्यात सांगितले होते की, एका वर्षाच्या आत अशी परिस्थिती निर्माण होईल की, अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसशी अधिक जवळून जोडण्यास भाग पाडले जाईल. ते एक मोठे विधान होते. गांधींनी तुमच्याशी संपर्क साधला का?
काँग्रेस अध्यक्ष खरगे हे आमच्याशी संपर्कात होते.
प्रश्न – खरगे यांनी तुम्हाला हे बोलून दाखवले का?
त्यांनी इतकेच सांगितले की, एकत्र काम करण्याची गरज आहे. या मार्गावर पुढे जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. इंडिया आघाडी भाजपामध्ये सामील होऊ शकत नाही.
प्रश्न: राहुल गांधी यांच्या एकूण नेतृत्वाविषयी तुम्ही काय सांगाल?
ते कठोर परिश्रम घेतात. जेव्हा देशात समस्या उद्भवतात तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देतात. पण आज राहुल गांधींसाठी काहीतरी मोठे करण्यासाठी असे वातावरण नाही. मी फक्त एवढेच म्हणेन की, त्यांनी तळागाळात आणखी आक्रमकतेने काम करण्याची गरज आहे. फक्त राहुल गांधीच नाही, तर सर्व विरोधी पक्षांनी हे करण्याची गरज आहे.
प्रश्न – २०२४ च्या निवडणुकीत २४० जागा कमी पडूनही, भाजपा पक्ष पूर्वीइतकाच मजबूत असल्यासारखे वागतोय का?
तोच भाजपा आहे.
प्रश्न – इंडिया आघाडीच्या भवितव्याविषयी तुम्ही काय सांगाल?
आज परिस्थिती इंडिया आघाडीकरिता अनुकूल नाही; पण परिस्थिती बदलली जाऊ शकते.
प्रश्न – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नक्की काय चूक झाली?
मला त्याविषयी माहीत नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती आमच्या बाजूने होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने होता. तेव्हा विधानसभा निवडणुकांमध्ये काय झाले? आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या प्रत्येक गावातील लोक म्हणतात की, आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे मतदान केले होते, तसेच विधानसभा निवडणुकीतही केले; पण निकाल वेगळा होता. मी निवडणूक आयोगाबद्दल काही विधान करू इच्छित नाही.
प्रश्न – तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याविषयी काय सांगाल?
आमच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पक्षात दोन मते आहेत. एक मत म्हणजे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीबरोबर पुन्हा एकत्र यावे आणि दुसऱ्या गटाला वाटते की, आम्ही भाजपाबरोबर जाऊ नये. इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊ आणि युतीची पुनर्रचना करू.
प्रश्न – पण तुम्ही आधीच इंडिया आघाडीमध्ये आहात?
इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल. तरुणांना त्यात सामील करावे लागेल आणि काम करावे लागेल.
प्रश्न – तुम्ही अलीकडेच आठवड्यात दोनदा तुमचे पुतणे अजित पवार यांना भेटलात?
ते राजकारणासाठी नव्हते. शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्था आहेत, जिथे आम्ही त्यांच्याबरोबर, एनडीएबरोबर, डाव्या पक्षांबरोबर काम करतो आणि आम्ही ते करत राहू.
प्रश्न – तुमची लेक सुप्रिया सुळे यांचे काय?
संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे ठरविण्यासाठी तिला भूमिका घ्यावी लागेल.
प्रश्न – मोदी सरकारने जाहीर केलेल्या जातीय जनगणनेबद्दल तुमचे काय मत आहे?
ठीक आहे. अनेक वर्षांपासून त्याची मागणी केली जात होती.
प्रश्न – काहींना भीती आहे की, यामुळे सामाजिक विभाजन होईल.
असे काही परिणाम होऊ शकतात.
प्रश्न – भारताचे भविष्य तुम्हाला कसे दिसते?
मी आशावादी आहे. या देशात संसदीय लोकशाही आपल्यामुळे नाही; तर ती सामान्य लोकांच्या समजदारीमुळे कार्यरत आहे.