काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते तथा खासदार शशी थरुर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. थरूर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे आणि थरूर अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना थरूर यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये बदल हवा असेल, तर मला मतदान करा असे आवाहन केले आहे. त्यांनी काँग्रेसमधील बंडखोर जी-१३ गटालाही लक्ष्य केले आहे.

हेही वाचा >> Congress President Election: अर्ज दाखल करताच शशी थरुर यांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसमधील हायकमांड संस्कृती…”

पक्षामधील परिस्थती जैसे थे हवी असेल तर तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे यांना मतदान करावे. तसेच तुम्हाला काही बदल हवा असेल तर त्यासाठी मी उभा आहे. तुम्हाला तळागाळातील लोकांमध्ये बदल पाहायचा असेल. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असे वाटत असेल. ब्लॉग, जिल्हा, राज्य पातळीवर तुम्हाला पक्षामध्ये नवी उर्जा हवी असेल, तर मला मतदान करा, असे शशी थरूर म्हणाले.

हेही वाचा >> Congress President Election: शशी थरुर यांना जी-२३ नेत्यांचा विरोध? थरुर म्हणाले, “मी या निवडणुकीत…”

काँग्रेसमधील बंडखोर जी-२३ गटातील काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. यावरही शशी थरूर यांनी भाष्य केले. जी -२३ गटातील चार ते पाच नेते खर्गे यांना पाठिंबा देत असतील, तर मी त्यांच्या मताचा आदर करतो. मात्र हे चार किंवा पाच नेते काँग्रेसमधील पूर्ण ९१०० मतदारांचे मत ठरवू शकत नाहीत. एवढेच नाही तर ते स्व:ताच्या मताशिवाय जी-२३ गाटातील अन्य नेत्यांचेही मत ठरवू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी जी-२३ गटातील खर्गे यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा >> “राहुल गांधींना गांभीर्य नाही, कोणतीही जबाबदारी न घेता अधिकार हवे,” आसामच्या मुख्यमंत्र्यांची टीका

दरम्यान, शशी थरूर यांनी आज (३० सप्टेंबर) आपल्या समर्थकांसह काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी राजघाट आणि राजीव गांधी स्मृतीस्थळावर प्रार्थना केली. नंतर ढोल-ताशाच्या गजरात काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.