-अविनाश कवठेकर

राज्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेचा ‘मित्र’ बदलला. या बदलांमुळे पुण्यात शिवसेनेची फरफटच झाली असल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर स्वबळावर लढायचे की, आघाडी म्हणून लढायचे याची निश्चिती नसल्यामुळे महापालिका निवडणुकीची तयारी करतानाही शिवसेनेला दोन्ही डगरींवर पाय ठेवावे लागत असल्याचे दिसत आहे. सन्मानाने झाली तरच आघाडी, अन्यथा स्वबळावरच निवडणूक, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.

हेही वाचा : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेताना अजित पवार यांनी स्वबळाची चाचपणी केली होती. आगामी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा निर्धार त्यांनी आढावा बैठकांमध्ये व्यक्त केला. तर मुंबई, पुण्यात आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, असा नारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचीही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाली आहे. नव्या मित्रांची बदललेली भूमिका, शिवसेनेतील पक्षांतर्गत सत्तासंघर्ष या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मात्र दोन्ही आघाड्यांवर तूर्त अवलंबून राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविण्यासंदर्भातील दबाव वाढत असताना आगामी निवडणुकीत आघाडी करायची की, निवडणूक स्वबळावर लढवायची, याचा सर्वस्वी निर्णय उद्ध‌व ठाकरेच घेतली. मात्र सन्मानाने होणार असले तरच आघाडी व्हावी, अन्यथा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिक खंबीर आहेत, असा दावा शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवसेनेने लढविलेल्या जागांवर शिंदे गटाकडून दावा –

एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाची युती आगामी निवडणुकीत होईल, असे भाजप आणि शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातच गेल्या निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या जागांवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. गेली महापालिका निवडणूक शिवसेनेकडून स्वबळावर लढविण्यात आली होती. राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने आगामी निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास जागा वाटपाचाही मुद्दा शिवसेनेच्या दृष्टीने कळीचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी विजयी झालेल्या जागा राष्ट्रवादीकडेच राहिले. तसेच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ज्या प्रभागात दुसऱ्या जागेवर आहे, त्या जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला आहे.

हेही वाचा : गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीचे शिंदे-फडणवीस सरकारला वावडे

महापालिकेच्या १६४ जागांपैकी केवळ दहा जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला होता. बदललेल्या राजकीय परिस्थितीत पुन्हा स्वबळावर निवडणूक लढविण्याची वेळ आली तर शिवसेनेकडे सक्षम उमेदवार राहणार का, आणि आघाडीत किती जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार हा मुख्य प्रश्न आहे.

सत्तेसाठी आम्ही कोणाबरोबरही फरफटत जाणार नाही – नीलम गोऱ्हे

“महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चांगले ऋणानुबंध जुळलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगला संपर्क आहे. पण, भविष्यातील निवडणुका बरोबरीने लढण्याबाबत काय परिस्थिती राहील, यावर आत्ता भाष्य करणे योग्य नाही. सत्तेसाठी आम्ही कोणाबरोबरही फरफटत जाणार नाही. आत्मसन्मान राखून जे काही बेरजेचे राजकारण करावे लागेल, तो निर्णय पक्षप्रमुख घेतील.” अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेला तूर्त दोन्ही आघाड्यांवर हात ठेवावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.