सुहास सरदेशमुख

‘होय हे संभाजीनगरच’., ‘ जिथे वृत्ती रझाकारी तिथे शिवसेना वार- करी’ असे फलक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी लावत शिवसेनेकडून हिंदुत्वाचा नारा अधिक जोरकसपणे दिला जाईल असे संकेत देण्यात आले आहेत. भाजप व मनसेच्या हिंदुत्वापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे आणि रझाकारांशी लढणारे असल्याचा आक्रमक संदेश देत महापालिका निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाची खेळी शिवसेना खेळत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलाताबाद येथे औरंगजेबच्या कबरीवर भगवा फेटा घालून नतमस्तक होणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर रझाकाराची मानसिकता व वृत्ती असल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे. पण तत्पूर्वीच नतमस्तक होण्याची ती कृती केवळ मुस्लिम रिवाजाचा भाग होता. औरंगजेब हा एमआयएमचा आदर्श नाही तसेच रझाकाराशीही आमचा संबंध नाही, अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली. माेगलांच्या व निजामाच्या ४०० वर्षांपूर्वीच्या पराभवाचे खापर आता मुस्लिमांवर फोडणे चुकीचे असल्याची भूमिका खासदार जलील यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र जलील यांनी केलेली कृती आणि नंतर मांडलेली भूमिका यातील विरोधाभास हे कळ काढून पळून जाणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतीक  असल्याची टीकाही जलील यांच्यावर होत आहे.

महापालिकेचा कारभार शिवसेना नेतृत्वाच्या हातात असताना ढिसाळ होताच. त्याला भाजपचीही तेवढीच साथ होती. पण राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेने साथ सोडल्यानंतर औरंगाबादमध्ये भाजपनेही जणू आपण त्या गावचेच नाही अशारितीने शहराच्या सर्व समस्यांसाठी शिवसेनेवर खापर फोडण्यास सुरुवात केली आहे. जलआक्रोश मोर्चा हा त्याच रणनीतीचा भाग होता. पाण्यासह विविध नागरी समस्यांनी हैराण असलेल्या औरंगाबाद शहरात त्यानिमित्ताने एक वातावरण निर्माण करण्यात मात्र भाजपला यश आले हे निश्चित. 

करोनाकाळात प्रशासक नेमल्यानंतर स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पातून शहरात अनेक उपक्रम सुरू झाले. किमान काही सकारात्मक होत असल्याचा संदेश प्रशासकीय कारभारातून पुढे येऊ लागला. हे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने चालना दिली ती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी. त्यामुळे रस्ते व कचरा प्रश्नी झालेल्या बदलाचे श्रेय शिवसेनेकडून घेतले जात आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे शिवसेनेचे किंबहुना पालकमंत्र्यांचे अधिक ऐकतात, असेही आरोप करण्यात आले. प्रशासकीय कार्यकाळात जी काही प्रगती झाली तसा विकास वेग ठेवण्यात सत्ताधारी म्हणून करण्यात शिवसेना कमी पडली, हे वास्तव निवडणुकीच्या प्रचारापर्यंत टिकण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. कारण आता प्रचार रझाकारी वृत्तीभोवती केंद्रित करण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे. भाजप व मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत असताना एमआयएमचा प्रभाव असलेल्या औरंगाबादमध्ये आपण हिंदुत्वाच्या राजकारणात मागे पडू नये याची काळजी शिवसेना घेत आहे. रझाकारी प्रवृत्तीवर वार करण्याची भाषा ही त्याचा परिपाक आहे. त्याचबरोबर विकासकामे व कारभारापेक्षा हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाकडे निवडणुकीतील वातावरण वळावे हा त्यामागील हेतू असल्याचे दिसत आहे.