एजाजहुसेन मुजावर शिवसेनेत वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार ॲड. शहाजी पाटील गेले आहेत. शिवाय शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख असलेले मूळ सोलापूरचेच; पण शेजारच्या मराठवाड्यातील आमदार तानाजी सावंत यांनीही संधी साधत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे पसंत केले आहे. पक्षात बंड झाल्यानंतर अडचणीत आलेल्या शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर निष्ठा कायम राखण्यासाठी सोलापुरात पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि शिवसैनिक पुढे येत आलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दार म्हणून रस्त्यावर उतरण्याचा त्रासही स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. शहर व जिल्ह्यात शिवसेना थंडच दिसून येते. यासंदर्भात जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्याशी,संपर्क साधला असता त्यांनी आपण आजारी असल्यामुळे पुण्यात वैद्यकीय उपचार घेत आहोत. उद्या परवा सोलापुरात आल्यानंतर पुढील कृती करू. आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच बाजूने राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात सेनेचे चार जिल्हाप्रमुख आहेत. सध्या तरी यापैकी कोणीही पक्षाच्या पडत्या काळात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार ॲड. शहाजी पाटील (सांगोला) हे मूळचे काँग्रेसचे. सांगोला तालुक्यातील राजकारणात त्यांनी शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या विरोधात कायम संघर्ष केला. त्यासाठी त्यांना शिवसेनेचा आधार घेऊन दोनवेळा आमदार होण्याची संधी लाभली तरीही स्थानिक पातळीवर पक्षापासून ते अंतर ठेवून राहिले आहेत. मूळचे माढा तालुक्यातील असलेले माजी मंत्री तानाजी सावंत हे शिक्षण आणि साखर सम्राट आहेत. त्यांनी मातोश्रीवर प्रभाव पाडून उपनेतेपद, मंत्रिपद मिळविले होते. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल (बार्शी), रश्मी बागल (करमाळा), माजी आमदार दिलीप माने (सोलापूर शहर) आदींना सेनेत आणून विधानसभेची उमेदवारीही मिळवून दिली होती. परंतु त्याचा विपरीत परिणाम होऊन पक्षात बंडखोरी झाली आणि केवळ सांगोल्याचे ॲड. शहाजी पाटील यांचा अपवाद वगळता सावंत यांनी आयात केलेले सर्व उमेदवार पराभूत झाले होते. अर्थात त्याचे खापर सावंत यांच्या माथ्यावर फोडण्यात आले. परिणामी, पक्षाने त्यांना अडगळीत टाकले होते. त्याबद्दलची नाराजी सावंत यांनी उघडपणे बोलून दाखविली होती. गेल्या वर्षी याच सावंत यांचे पुनर्वसन होऊन ते पक्षात सक्रिय झाले होते. त्यांच्या पुढाकाराने शिवसेनेत आलेले दिलीप सोपल, रश्मी बागल, दिलीप माने तसेच दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील ही मंडळीही शिवसेनेत असूनही नसल्यासारखी आहेत. प्राप्त परिस्थितीत त्यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेनेत असूनही मोहिते-पाटील गटाचे मानले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने त्यांना बंडखोरी करणे भाग पडले होते. ते आता मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक साधू शकतात. करमाळ्यातील सेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध साधून आहेत. ठाकरे व शिंदे दोघेही पुन्हा एकत्र येतील, अशी त्यांना आशा वाटते. एकंदरीत, जिल्ह्यात शिवसेनेत सर्वंकष नेतृत्वाअभावी मरगळ असताना एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ही मरगळ आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात निष्ठेपेक्षा सत्ताकारणाचे गणित महत्त्वाचे मानले जाते.