मोहनीराज लहाडे

काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘जिल्हा विकास आघाडी’चा प्रयोग राबवला होता. काँग्रेसमधीलच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख विरुद्ध अपक्ष विखे असा ऐतिहासिक निवडणूक खटला आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी निर्माण झालेल्या विखे यांच्या राजकीय वैमनस्याची सुरुवात, अशी सर्व पार्श्वभूमी त्याला होती. आता विखे यांचा भाजपमध्ये खासदार असलेले नातू डॉ. सुजय विखे आता तोच ‘जिल्हा विकास आघाडी’चा प्रयोग पुन्हा राबवू पाहत आहेत. विखे घराण्याच्या या जुन्या प्रयोगाला सुजय हे कशाप्रकारे नवे रूप देतात आणि जिल्ह्यातील सर्व पक्षीय नवीन पिढी कसा प्रतिसाद देते यावर जिल्ह्यातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. त्यामुळेच बहुदा खासदारांच्या या मनसुब्याने जिल्हा भाजपमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

बाळासाहेब विखे काँग्रेसमध्ये असताना ‘ते विरुद्ध काँग्रेस’ असेच जिल्ह्याचे चित्र राहायचे. आताही आमदार राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे भाजपमध्ये असले तरी ‘ते विरुद्ध इतर सारे’ असेच चित्र कायम आहे. बाळासाहेब विखे  १९९२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात त्यांची जिल्हा विकास आघाडी घेऊन उतरले होते. त्यावेळी आघाडीला फारसे यश मिळाले नाही आणि जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसच्याच ताब्यात राहिली होती.

अलिकडेच विखे फाउंडेशनच्या विळद घाटातील कार्यक्रमात बोलताना खासदार विखे यांनी जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग करण्याचा मनसुबा बोलून दाखवला. नगर जिल्ह्यात पक्षीय व पक्षविरहित अशा दोन पद्धतीने राजकारण चालते. जुन्या काळातही जिल्हा विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवल्या गेल्या होत्या. अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे बंधन नको असते. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली असली तरी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांशी पटत नाही. नगर शहर, पारनेर या ठिकाणी राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्यास तयार नाहीत. इतरही तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी काही लोकांना भाजपबरोबर जायचे नाही. अशा परिस्थितीत निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी आणि भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी, असा प्रयोग करावा लागेल अशी सुजय विखे यांची मांडणी आहे. मात्र, त्यासाठी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची संमती महत्त्वाची असणार आहे. 

आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजप प्रदेशच्या प्रमुख नेत्यांना प्रत्येकी दोन जिल्ह्यांचे प्रभारी करण्यात आले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. फडणवीस यांचा नगर दौरा अलीकडे दोनदा पुढे ढकलला गेला. आता पुन्हा जिल्हा भाजपच्या पातळीवर त्यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू आहे. या दौऱ्यात खासदार विखे यांच्या मनसुब्यावर चर्चा घडवून आणण्याचे काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, खासदार विखे यांच्या या मनसुब्याने जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. विखे भाजपमध्ये असले तरी त्यांचे जिल्ह्यातील अनेक समर्थक अद्याप राजकीयदृष्ट्या विखुरलेल्या स्थितीत आहेत.

या सर्व घडामोडींवर भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. जिल्हा विकास आघाडीच्या प्रयोगाची खासदार विखे यांची वैयक्तिक भूमिका असेल. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षामध्ये अशा पद्धतीने निर्णय होत नाहीत. जिल्हा विकास आघाडी स्थापन करण्याबाबत जिल्हा भाजपच्या समितीमध्येही अद्याप चर्चा झालेली नाही, समितीपुढे विषयही आलेला नाही. अशा धोरणात्मक निर्णयांना प्रदेश समितीची संमती आवश्यक असते, अशा सूचक शब्दांत राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांना वाटले म्हणून अशी आघाडी होणार नाही, असे सूचित केले आहे. त्यामुळे नगरमध्येही मूळ भाजपचे नेते व गेल्या काही काळात भाजपमध्ये आलेले स्थानिक प्रभावशाली नेते यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.