तेलंगणाचे मदतीचे प्रारुप महाराष्ट्रात; शेतकऱ्यांना आपलेसे करण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न, फडणवीस यांच्यावर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदानाची घोषणा म्हणजे एक प्रकारची भीक असल्याची टीकाही राव यांनी केली. 

chandrashekhar rao devendra fadanvis
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नांदेड : भाजप व काँग्रेस यांनी सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही देशातील शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधार झाला नसल्याचा आरोप करत आणि २४ तास मोफत वीज, पाणी, लागवडीसाठी एकरी दहा हजार रुपये व अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये देण्याचे पंचसूत्री तेलंगणा प्रारुप समोर ठेवत भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  महाराष्ट्रात त्यांचा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदानाची घोषणा म्हणजे एक प्रकारची भीक असल्याची टीकाही राव यांनी केली. 

नांदेड जिल्ह्.यातील लोहा येथील बैलबाजार मैदानावर आयोजित जाहीर सभेत रविवारी बोलताना ‘अब की बार, किसान सरकार’ हा नारा देऊन राव यांनी शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तुम्ही जात, धर्मापलिकडे विचार करून एकी साधावी, असे आवाहन केले. सभेची सुरुवातच राव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.. फडणवीस यांच्याकडून घोषित करण्यात आलेले वार्षिक सहा हजार रुपये अनुदान एक प्रकारची भीक असल्यासारखी असून त्यामागेही भारत राष्ट्र समितीच्या नांदेडमधील सभेला मिळालेल्या प्रतिसादाचा  धसका असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तेलंगणातील पंचसूत्रीचे प्रारुप लागू केले आणि दलितबंधूंना १० लाख रुपये देण्याची योजना लागू केली तर आपण येथे येणे बंद करू, असे आव्हानही त्यांनी फडणवीस यांना दिले.

हेही वाचा >>> शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार एकत्र येणार?

देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करत आहे. या संपूर्ण ७५ वर्षांच्या कालखंडाचे अवलोकन केले तर जवळपास ५४ वर्षे काँग्रेसच्या हातात तर १६ वर्षे भाजपकडे देशाची सत्ता राहिली आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. पंतप्रधान .निवडणुका आल्या की गोड-गोड बोलून शेतकऱ्यांची माफी मागतात. आणि त्यांच्या भूलथापाना बळी पडतो. त्यामुळे आता शेतकरी आमदार झाला पाहिजे, असे ते राव म्हणाले. राव यांनी भाषणाची सांगता जय तेलंगणा, जय महाराष्ट्र, जय भारतची घोषणा देऊन केली. या सभेला हरियाणातील गुरुनामसिंह चढ्ढा यांच्यासह माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार धोंगडे अण्णा, हर्षवर्धन जाधव आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा >>> राजकीय पाठशिवणीचा खेळ पुन्हा नव्याने, महाविकास आघाडीच्या सभेनंतर शिवसेनेची धनुष्यबाण यात्रा

नांदेडच्या विमानतळसेवेची खिल्ली

नांदेडच्या विमानतळावरून रात्रीचे उड्डान होत नसल्याचे आपल्याला सांगण्यात आले. पूर्वी रात्री येथून उड्डान होत असल्याचे माहिती होते. परंतु विमानतळावरून रात्रीचे उड्डान होत नसल्याचे सांगण्यात आले तेव्हा के. चंद्रशेखर राव यांनी त्यावरून देशाची प्रगती होत आहे की अधोगती, असा प्रश्न उपस्थित करून विकासाच्या मुद्याची खिल्ली उडवली.

देशात मुबलक कोळसा, पाणी

देशात पुढील सव्वाशे वर्षे पुरेल एवढा कोळसा उपलब्ध आहे. तब्बल ३६१ मिलियन टन कोळसा असून त्याद्वारे वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना २४ तास पुरवठा करता येऊ शकतो. परंतु ते आपल्याकडे होत नाही. देशातील ४१ कोटी एकर जमीन कृषीभूमी असून येथे स्वच्छ सूर्यप्रकाश, मुबलक पाऊस आणि आंबा ते सफरचंदांपर्यंतचे पिके येथे पिकतात. परंतु देशातील ५० हजार टीएमसी पाणी समुद्राला जाऊन मिळते, पण त्याचे नियोजन होत नाही. त्याच पाण्याचे नियोजन करून शेतीला पुरवले तर शेती सुजलाम-सुफलाम होईल. दुर्दैवाने पाण्याऐवजी आपल्याला भाषण दिले जाते, असे टीकास्त्र राव यांनी राज्यकर्त्यांवर सोडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 19:43 IST
Next Story
Karnataka : आरक्षण रद्दच्या निर्णयामुळे मुस्लिमांमध्ये असंतोष, कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा!
Exit mobile version