बालविवाह विरोधात आसाम सरकारने कडक भूमिका घेणं सुरू केलं आहे. मात्र तरीही राज्यात बालविवाहाची प्रकरणं कमी होताना दिसत नाहीत. परिस्थिती अशी आहे की, मागील आठवडाभरात बालविवाहाची चार हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वत: यास दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री हेमंत शर्मा यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे की, “आसाम सरकार राज्यात बालविवाह रोखण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आतापर्यंत आसाम पोलिसांनी राज्यभरात चार हचार चार प्रकरणं नोंदवली आहेत आणि येणाऱ्या काळातही पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणांवर ३ फेब्रुवारीपासून कारवाई सुरू होईल. सर्वांनी सहकार्य करावे, अशी मी अपेक्षा बाळगतो.” मुख्यमंत्री शर्माने अशातच काही समुदायांशी बालविवाह संदर्भात चर्चा केली होती. तसेच, बालविवाहाची वाईट प्रथा राज्यभरातून हद्दपार करण्यासाठी सरकारने दृढ संकल्प केला असल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. त्यांनी दर्शवलेल्या आकडेवारीनुसार बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणं ३७० हे धुबरी जिल्ह्यात असून त्या खालोखाल होजाईमध्ये २५५ आणि उदलगुरीमध्ये २३५ प्रकरणं आहेत. दीमा हसाओमध्ये बालविवाहाची सर्वात कमी प्रकरणं दिसून आली आहेत. वर्ष १९२९ अधिनियमनुसार १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलांच्या विवाहास मनाई आहे. वर्ष १९७८ च्या अधिनियमात बदल करून विवाहासाठी महिलांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि पुरुषांसाठी २१ वर्षे करण्यात आली आहे.