कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत असताना राजकारण्यांमध्ये वाद-प्रतिवाद पाहायला मिळत आहेतच. त्याशिवाय कर्नाटकात सध्या प्रशासकीय वर्तुळात देखील खळबळ माजली आहे. एक आयएएस आणि एक आयपीएस महिला अधिकारी मागच्या काही दिवसांपासून एकमेकींवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. सोशल मीडियावरुन एकमेकींवर गंभीर आरोप केले जात आहेत. तसेच सोशल मीडियावर काही खासगी फोटो लिक केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी मुख्य सचिवांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता दोन्ही महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातून बाजूला केले गेले आहे. मात्र त्यांना नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही.

आयपीएस अधिकारी रुपा यांनी सनदी अधिकारी सिंधुरीवर भ्रष्टाचाराचे १९ आरोप केले असून तीन पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना तिने तिचे फोटो पाठविल्याचा आरोप केला आहे. सिंधुरी यांनी २०२१ आणि २०२२ मध्ये हे फोटो इतर अधिकाऱ्यांना पाठवले होते, असा आरोप केला गेला. या आरोपांना रोहिणी सिंधुरी यांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या बदनामीसाठी व्हॉट्सअपवरील स्टेटसचे स्क्रिनशॉट एकत्र करण्यात आले आहेत. तसेच मी काही अधिकाऱ्यांना फोटो पाठवले, असा आरोप करत असताना त्यांनी त्या अधिकाऱ्यांची नावे उघड करावीत, असा पलटवार रोहिणी सिंधुरी यांनी केला आहे.

हे वाचा >> एक रुपया परत दिला नाही म्हणून कोर्टात गेला, मिळाली ‘इतकी’ नुकसान भरपाई; तुम्हीही करु शकता अशी तक्रार

कोण आहेत आयपीएस डी रुपा?

रुपा या २००० च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. सध्या त्या कर्नाटक राज्यात हस्तशिल्प विकास महामंडळ लिमिटेड (KSHDC) च्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करत आहेत. १९९४ च्या एका खटल्यात रुपा यांनी २००४ मध्ये मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक केली होती. तेव्हा त्यांची देशभर चर्चा झाली होती. २०१६ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. अलीकडच्या काळात मात्र त्या अनेक वादात सापडल्या.

डी रुपा यांनी आपल्या फेसबुकवर सिंधुरी यांचे फोटो लिक केले –

आयपीएस डी रुपा यांनी आपल्या फेसबुकवर IAS रोहिणी सिंधुरी यांचे काही फोटो अपलोड केले
आयपीएस डी रुपा यांनी आपल्या फेसबुकवर IAS रोहिणी सिंधुरी यांचे काही फोटो अपलोड केले

जुलै २०१७ मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृह) पदावर काम करत असताना त्यांनी त्यांचे वरिष्ठ एचएन सत्यनारायण राव यांच्यावर AIADMK च्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना खास वागणूक दिल्याचा आरोप केला होता. शशिकला यांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर रुपा यांची कारागृह विभागातून बदली करण्यात आली.

हे वाचा >> पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे

तीन वर्षांनंतर २०२० मध्ये, सध्याचे पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्यासोबत त्यांचा जाहीर वाद झाला होता. सेफ सिटी प्रकल्पावरुन दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. निंबाळकर यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून रुपा यांनी एका निविदेतील गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला होता. सरकारने चौकशी केल्यानंतर रुपा यांनी मान्य केले की, त्यांनी निविदेतील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यामध्ये गैरप्रकार असण्याचा संशय आला असल्यामुळे माहिती मागवली, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सरकारने निंबाळकर आणि रुपा यांची त्यांच्या विभागातून बदली केली.

कोण आहेत आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी?

रोहिणी सिंधुरी या २००९ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. रुपा यांच्याप्रमाणेच रोहिणी देखील अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१५ साली स्वच्छ भारत अभियानाची उत्तम अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांना केंद्र सरकारने सन्मानीत केले होते. आयएएस अधिकारी डी. के. रवी यांच्या आत्महत्येनंतर रोहिणी यांचे नाव प्रकाशात आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी रवी यांनी रोहिणी यांना एक एसएमएस पाठवला होता. मात्र २०१६ साली सीबीआयने रवी यांची आत्महत्या वैयक्तिक कारणांमधून झाल्याचे सांगत हे प्रकरण बंद केले. २०१७ साली त्या हसन जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी काँग्रेस नेत्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ए. मंजू यांच्याशी वाद घातला होता. २०१८ साली सरकारने त्यांची बदली केली, मात्र निवडणूक आयोगाने ही बदली रोखली होती.

२०१८ सालची बदली रोखण्यासाठी रोहिणी सिंधुरी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यावेळी त्यांची बदली रोखली. मात्र काँग्रेस-जेडी (एस) यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एचडी रेवन्ना यांच्याशी मतभेद झाल्यामुळे सिंधुरी यांची बदली करण्यात आली.

हे वाचा >> CCTV Video: तीन भटके कुत्रे, चार वर्षांचा लहान मुलगा; भररस्त्यात कुत्र्यांनी लचके तोडल्यानंतर मुलाचा दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर म्हैसूरच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तिथेही शासकीय निवासस्थानाचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. निवासस्थान हेरिटेज असल्यामुळे त्याठिकाणी केलेल्या बांधकामावर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच आमदार महेश यांनी सिंधुरी यांच्यावर वाढीव किमतीमध्ये निकृष्ट दर्जाच्या पिशव्या विकत घेतल्याचाही आरोप केला होता. या आरोपावर राज्य सरकारने मागच्या वर्षीच चौकशीचे आदेश दिले आहेत.

करोना महामारीच्या दरम्यान सिंधुरी यांच्यावर एक मोठा आरोप लावण्यात आला होता. म्हैसूरच्या शेजारी असलेल्या चामराजनगरमध्ये २४ लोकांचा मृत्यूसाठी सिंधुरी यांना जबाबदार धरण्यात आले होते. सिंधुरी यांनी ऑक्सिजन सिलिंडर नेण्यापासून रोखल्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालय आणि राज्याने नियुक्त केलेल्या समितीने हे आरोप फेटाळून लावले. तसेच डिसेंबर महिन्यात लोकप्रिय गायक लकी अली यांनी आरोप केला होता की, बंगळुरुमध्ये त्यांच्या मालकीच्या जागेवर सिंधुरी यांच्या मदतीने भूमाफीयाने बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे.