scorecardresearch

Premium

पक्षवेध : रौप्य महोत्सवी वर्ष राष्ट्रवादीसाठी कसोटीचे

नेत्यांमधील दुफळी, पहिल्या फळीतील काही नेत्यांची पक्ष सोडण्याची मानसिकता, तसेच आगामी निवडणुका या साऱ्या आव्हानांचा सामना करीत रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

silver jubilee year NCP
पक्षवेध : रौप्य महोत्सवी वर्ष राष्ट्रवादीसाठी कसोटीचे (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द होणे, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून झालेला गोंधळ, नेत्यांमधील दुफळी, पहिल्या फळीतील काही नेत्यांची पक्ष सोडण्याची मानसिकता, तसेच आगामी निवडणुका या साऱ्या आव्हानांचा सामना करीत रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पक्षाच्या स्थापनेपासून जवळपास साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेत होता. नुसता सत्तेत नव्हता तर राज्याची सारी सूत्रेच या पक्षाकडे होती. सत्ता नसल्यावर पक्षात अस्वस्थता निर्माण होते. तसेच चित्र सध्या काहीसे बघायला मिळत आहे. शरद पवार यांचा एकखांबी तंबू असलेल्या या पक्षाचे सारे राजकारण पवार कुटुंबियासभोवताली फिरत राहिले. शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषण करताच पक्षात खदखद निर्माण झाली. भावी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याच नावाची चर्चा झाली. अजित पवार यांचे एकदा बंड फसले. २०१९च्या विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग आकारास येत असतानाच अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांनी अजितदादांचे बंड मोडून काढले. पण तेव्हापासून पक्षाची घडी विस्कटली, असे पक्षातील नेते खासगीत सांगतात.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

हेही वाचा – कोल्हापूर जातीय तणावामागे राजकारणाची किनार?

अजित पवार यांच्याबाबत अलीकडेच पुन्हा एकदा संंशयाचे वातावरण निर्माण झाले. अजितदादा भाजपबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. पण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली असली तरी त्यावर विश्वास ठेवायला पक्षातील नेतेही तयार नाहीत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादीचे भवितव्य ठरेल, असा अंदाज वर्तविला जातो. कारण लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यास राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी व काँग्रेसमधील राज्यातील बडे नेते भाजपमध्ये दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविला जाते. राजीनाम्याची घोषणा करून नंतर मागे घेतल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी त्यातून त्यांनी अजितदादांना खिंडीत पकडल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीची आगामी काळातील वाटचाल ही पवार काका-पुतण्याचे संबंध कसे राहतात यावरही बरीच अवलंबून असेल. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यावर अजित पवार यांचा एकमेव अपवाद वगळता सर्व नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदींच्या डोळ्यात आश्रू आले होते.

२४ वर्षांत राष्ट्रवादीने बरेच काही साधले. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली. काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील हे पवारांचे गणित मात्र चुकले. पक्षाच्या स्थापनेनंतर चारच महिन्यांत राज्याच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागली होती. शरद पवार यांची ६० आमदार निवडून आणण्याची क्षमता, असे नेहमी बोलले जाते. काँग्रेसबरोबर आघाडीत २००४ मध्ये ७१, २००९ मध्ये ६२ तर २०१९ मध्ये ५४ आमदार निवडून आले. राज्याच्या सत्तेत सारी महत्त्वाची खाती, सरकारवर वर्चस्व असतानाही राष्ट्रवादीला रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असतानाही राज्याच्या सर्व भागांमध्ये ताकद निर्माण करता आली नाही. विदर्भ आणि मुंबईत गेल्या दोन दशकांमध्ये पक्ष ताकदीने उभा राहू शकला नाही. या दोन्ही भागांमध्ये पक्षाला अल्प यश मिळत गेले.

हेही वाचा – विरोधकांच्या बैठकीचे गांभीर्य कायम राहावे यासाठी नितीश कुमारांची धडपड, म्हणाले “बैठकीला फक्त…”

पक्षाची सहकारावरील मक्तेदारी हे राष्ट्रवादीच्या यशाचे सर्वाधिक गमक आहे. पण मक्तेदारीवर घाला घालण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न भाजपकडून सुरू झाले आहेत. सहकारातील विविध ताकदवान नेते भाजपच्या आश्रयाला जात आहेत. सहकारावरील वर्चस्व टिकवून ठेवण्याचे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान असेल. कारण सत्ता असल्याशिवाय सहकारावर वर्चस्व ठेवता येत नाही.

नेतेमंडळींमधील दुफळीही सध्या प्राकर्षाने जाणवत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परस्परांवर जाहीरपणे कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. आगामी निवडणुका राष्ट्रवादीसाठी खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई ठरेल. लोकसभा तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा वा पंचायत समित्यांमध्ये पक्षाला यश मिळाले तर विधानसभा निवडणुका लढविण्याकरिता बळ मिळेल. या दोन निवडणुकांमध्ये फार काही चांगले यश मिळाले नाही तर राष्ट्रवादीला गळती लागू शकेल. यामुळेच राष्ट्रवादीसाठी रौप्यमहोत्सवी वर्ष अधिक कसोटीचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The silver jubilee year is a test for the ncp print politics news ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×