पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेसला त्रिपुरात मात्र अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाढती बंडखोरी आणि पक्षांतर्गत वाद यामुळे त्रिपुरात टीएमसी पोखरली गेली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षाला राज्यात अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्रिपुरात विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर त्रिपुरात आता राजकीय घडामोडी घडण्यास सुरवात झाली आहे. त्रिपुरातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील तृणमूल कॉंग्रेसचे नेते बाप्तू चक्रवर्ती यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी तृणमूल काँग्रेसची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.बाप्तू यांच्यासह मोठ्या गटाने पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मोठा धक्का बसला आहे.

बाप्तू हे यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते.  दशकभरापूर्वी काँग्रेसच्या युवा शाखेतून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या बाप्तू यांनी नंतर भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपामधील लोकांनी इथल्या लोकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपा सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता तृणमूल काँग्रेस सोडताना त्यांनी आरोप केला आहे की “टीएमसी हा चांगला पक्ष नाही आणि इथे तो  सत्ताधारी भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे”.  

काँग्रेसमध्ये पुनरागमन करताना बाप्तू म्हणाले की, “राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील जुना पक्ष हा भाजपाविरुद्ध लढा देणारा सर्वात मोठा पक्ष आहे. आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलंच पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि ते करण्याच्या प्रयत्नाला माझा हातभार लागावा म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये परतत आहे”. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, टीएमसी आणि सीपीएम आणि भाजपासह इतर पक्षांचे सुमारे २,५१७ कार्यकर्ते रविवारी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणं आहे. यावर प्रत्युत्तर देताना टीएमसीने सांगितले की “राज्यातील सुमारे ५० नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. पक्षाला अंतर्गत मतभेदांनी ग्रासल्याचे आरोप दावे फेटाळले आहेत. टीएमसीचे ज्येष्ठ नेते राजीव बॅनर्जी म्हणाले “काल काँग्रेसने काही खोटे दावे करून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोणीही कोणत्याही पक्षात सामील होऊ शकतो. ही त्यांची निवड आहे. परंतु आमचे दिग्गज कार्यकारिणी सदस्य देबू घोष यांच्यासह अनेक टीएमसी कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा दावा केला होता, ते प्रत्यक्षात सामील झालेच नाहीत.”

जूनमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा पराभव झाला होता. त्यांना सुमारे ३ टक्के मते मिळाली होती. ज्यामुळे त्यांचे नेते अस्वस्थ झाले आहेत. विधानसभेच्या ४ जागांवर पोटनिवडणूक झाली. त्यात भाजपाचा तीन जागांवर तर काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला होता. गेल्या वर्षी टीएमसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत १६.३९ टक्के मते मिळाली होती. टीएमसी आगरतळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर होती. तेव्हा त्यांनी आम्हीच भाजपाला आव्हान देणारा पक्ष असल्याचा दावा केला होता.