इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (IPFT) आमदार बृष्केतू देबबरमा यांना पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्रिपुरा विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ आमदार बारबू मोहन त्रिपुरा यांनीही आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी माजी आमदार गौरी शंकर रेआंग यांच्या बरोबर तिपरा मोथा ( TIPRA ) पक्षात समावेश केला. बारबू मोहन हे २०१८ मध्ये भाजपाच्या तिकीटावर कारबूक विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडणून आले होते. त्यामुळे बारबू मोहन यांच्या राजीनाम्यानंतर आता त्रिपुरा विधानसभेचे संख्याबळ आता ५८ वर आले आहे.

हेही वाचा >>>>बारामतीत जोर लावणाऱ्या भाजपकडे उमेदवाराची वानवा

गेल्या साडेचार वर्षात भाजापाला सोडचिठ्ठी देणारे बारबू मोहन हे चौथे आमदार आहेत. यापूर्वी भाजपचे माजी आमदार आशिष दास यांनी मे २०२१ भाजपातून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपचे माजी आमदार सुदीप रॉय बर्मन आणि आशिष कुमार साहा यांनीही या वर्षाच्या सुरुवातीला पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा >>>> आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये ३२ जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य?; बहुमताने सरकार स्थापन करण्याचाही अमित शाहांना विश्वास!

भाजपाबरोबच त्यांचा मित्रपक्ष असलेल्या आयपीएफटीलाही झटके बसले आहेत. आयपीएफटीचे माजी सरचिटणीस आणि बिप्लब देब यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले मेवर कुमार जमाटीया यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मेवर हे कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिले असले, तरी त्यांच्या पत्नीसह त्यांचे अनेक जवळचे सहकाऱ्यांनी अलीकडेच तिपरा मोथा पक्षात प्रवेश केला आहे.