काही दिवसांपूर्वी त्रिपुरा सरकारमध्ये अचानक नेतृत्व बदल करण्यात आला होता. अचानक झालेल्या या नेतृत्व बदलामुळे राज्यात विशेषतः भाजपामध्ये राजकीय कलह वाढला होता. भाजपाच्या काही मंत्र्यांना हा निर्णय रुचला नाही. त्या नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. साधारणपणे नऊ महिन्यांनंतर त्रिपुरात विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच  निवडणूक आयोगाने चार विधासभा क्षेत्रात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. आगरतळा, टाउन बारडोवली, सुरमा आणि जुबराजनगर विधानसभा मतदारसंघात २३ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक म्हणजे उपांत्य फेरीसाठी आखलेली युद्धरेषाच आहे असे म्हणावे लागेल.

या पोटनिवडणुका सत्ताधारी भाजपसाठी, विशेषत: त्रिपुराच्या नवनियुक्त मुख्यमंत्री माणिक साहा यांच्यासाठी सत्त्वपरीक्षाच असणार आहे. तसेच सीपीआय(एम), काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) या विरोधी पक्षांसाठीसुद्धा आगामी निवडणुकांपूर्वीची लिटमस टेस्ट असणार आहे.

माजी मंत्री सुदीप रॉय बर्मन यांनी या वर्षी जानेवारीत भाजपाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यामुळे आगरतळा संघात पोटनिवडणुक घ्यावी लागते आहे. धलाई जिल्ह्यातील सुरमा मतदारसंघात, विद्यमान भाजप आमदार आशिष दास यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात टीएमसीमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दास यांनी आता टीएमसीचासुद्धा राजीनामा दिला आहे.

पोटनिवडणुक शांततेत आणि निष्पक्ष व्हावी यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, असे प्त्रिपुरा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) किरण दिनकरराव गित्ते यांनी सांगितले. 

सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशिष कुमार साहा म्हणाले की, “या निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष पार पडतील याची आम्हाला खात्री वाटत नाही. 

राज्यातील गेल्या चार वर्षांतील निवडणुकांचा आमचा अनुभव भयानक होता,”  याबाबत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे चिंता व्यक्त केली आहे. आयोगाने त्यांना आश्वासन दिले आहे की पूर्वी जे काही झाले ते पुन्हा होणार नाही. डाव्या पक्षांच्या वतीने बैठकीला उपस्थित असलेले सीपीआय(एम) चे नेते रतन दास आणि टीएमसीचे सरचिटणीस तपस कुमार रॉय यांनीही असेच आरोप करत निवडणूक प्रक्रिये विषयी चिंता व्यक्त केली आहे. 

या पोटनिवडणुका भाजपासाठी अनेक अर्थाने महत्वाच्या ठरणार आहेत. काही आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्री म्हणून बिप्लब कुमार देब यांची जागा घेणाऱ्या माणिक साहा यांच्यासाठी ही पहिली मोठी परीक्षा असणार आहे.

पोटनिवडणुकीतील निकालाचा परिणाम हा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.