दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : कृष्णा नदी प्रदुषण मुक्त व्हावी, नदीकाठची जमिन, हवा, पाणी प्रदुषण मुक्त व्हावे, आणि शुध्द पाणी, हवा आणि अन्न मिळावे या मागणीसाठी शेतकरी चळवळीतील दोन खंदे शिलेदार राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील हे एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. जागतिकीकरणाच्या आणि भांडवली शाही व्यवस्थेच्या विरोधात या दोन नेत्यांनी गेली दोन दशके पश्‍चिम महाराष्ट्रात लढा उभारला असला तरी सवता सुभा कायम असल्याने विखुरलेली शेतकरी चळवळ पुन्हा एकसंघ होउन भूमीपुत्रांना एका झेंड्याखाली आणतो की काय हे येणारा काळच सांगणार असला तरी हातकणंगले मतदार संघात वेगळी  राजकीय गणित मांडली जाउ शकतात असे राजकारण पडद्याआड रंगताना दिसत आहे.

शेतकरी आणि शेतीचे  प्रश्‍न अगणित आहेत. कधी उस दराच्या प्रश्‍नावर स्व. शरद जोशी यांनी शेतकर्‍यांची ताकद एकसंघ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २००४ मध्ये शरद जोशी यांनी भाजपशी मिळतेजुळते घेतल्याने जातीयवादी शक्तीबरोबर घरोबा नको या कारणाने शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटना काढली. या संघटनेत माजी राज्यमंत्री सदाभाउ खोतही होते. या दोघांना सर्जा राजाची जोडी म्हणूनच अख्खा पश्‍चिम महाराष्ट्र ओळखत होता. त्यांच्या आंदोलनामुळेच उसदराचा प्रश्‍न राजकीय पटलावर अधिक प्रकर्षाने मांडला गेला, आणि उस उत्पादकांना  दरहमीही मिळवता आली. दरम्यानच्या काळात रघुनाथदादा पाटील यांनी आपला लढा स्वतंत्रपणे सुरूच ठेवला होता. त्यांनी शरद जोशी आणि शेट्टी यांच्याशी फारकत घेउन शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शेट्टी यांनी भाजपशी युती केल्यानंतर खोत यांच्या रूपाने सत्तेत  सहभागही घेतला. मात्र, २०१६ मध्ये महायुती शासनाच्या काळात खोत सत्तेच्या मांडवात रेंगाळल्याने आत्मयलेष यात्रेच्या निमित्ताने खोत यांची संघटनेतून बाजूला करण्यात आले. त्यांनीही रयत क्रांती संघटनेच्या नावाने सवता सुभा मांडला असला तरी छातीवरचा बिा कायम ठेवला आहे.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘कॅग’चा अहवाल भाजपला फायदेशीर, ठाकरे गटावर कुरघोडी

आता तब्बल १९ वर्षानंतर पाटील-शेट्टी हे दोघे चळवळीतील कार्यकर्ते कृष्णा प्रदुषण मुक्तीसाठी सार्वजनिक चळवळीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. दोघांनाही कृष्णा खोर्‍यातील प्रश्‍नांची जाण आहे. आज जरी पश्‍चिम महाराष्ट्र सिंचनाच्या क्षेत्रात आघाडीवर असला तरी या सिंचन सुविधामुळे नवीन सामाजिक, आर्थिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. केवळ उस शेतीचेच प्रश्‍न आहेत असे नाही, तर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍नही गंभीर बनत चालला आहे. आज जरी कर्क रोगाची राजधानी म्हणून पंचगंगेकाठच्या काही गावांची ओळख निर्माण झाली असली तरी हीच वेळ कृष्णाकाठच्या गावाची होण्याला आता फार काळ उरलेला नाही. आज शेती रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे नापेर होउ लागली आहे. हवा, पाणी आणि जमिन प्रदुषित होत आहे. या प्रश्‍नाकडे आताच  गांभीर्याने पाहिले नाही तर येणारी पिढी माफ करणार नाही.  नदीला  पाणी आहे  मात्र, प्रदुषणामुळे पिता येत नाही अशी अवस्था आज शहरातच नव्हे तर खेड्यातही झाली आहे. यातून शुध्द पाणी विक्रीची दुकाने राजरोस विनापरवाना मोठ्या प्रमाणात  सुरू झाली असून पाण्याचा धंंदा मांडला गेला आहे.

हेही वाचा >>> “राज्यकर्ते हलकट, स्वार्थी आणि…” शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन राष्ट्रवादीचे अनिल गोटे यांची टीका

कृष्णा प्रदुषण मुक्तीच्या निमित्ताने का होईना शेतकरी चळवळीतील दोन दिग्गज एकत्र येत असताना राष्ट्रवादी व काँग्रेसचा हा बालेकिा हस्तगत करण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहेच, याच पार्श्‍वभूमीवर हातकणंगले मतदार संघातून शेट्टी यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. या मतदार संघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. मात्र, भाजपने राज्यातील सर्व 48 जागांसाठी स्वबळाची तयारी सुरू केल्याने माने यांना कितपत स्थान मिळते याचीही साशंकता आहेच, यामुळे या मतदार संघात सध्या तरी माने-शेट्टी या पारंपारिक लढतीला भाजपचा तिसरा कोन असणार याची उत्सुकता आहे. मात्र, या मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात अद्याप शांतताच दिसत असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणते पत्ते उघडले जातात, की मतदार संघ आंदण दिला जातो हे गुलदस्त्यातच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two leaders raju shetty ragunath patil of the farmers will come together print politics news ysh
First published on: 26-03-2023 at 14:28 IST