मुंबई : ‘मी कधीही हिंदुत्व सोडलेले नाही. उलट भाजपचे हिंदुत्व हे खोटे कथानक आहे’, असे भाजपला आक्रमकपणे प्रत्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील मेळाव्यात हिंदुत्वाचा पुरस्कार केला. ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत हक्काची मतपेढी कायम राहिल या दृष्टीने खबरदारी घेतली आहे.
नाशिकच्या मेळाव्यात ठाकरे यांचा भाषणाचा सारा भर हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने ठाकरे यांना लक्ष्य केले जाते. या साऱ्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या शिबिरात आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.
मी हिंदुत्व कधीही सोडलेले नाही हे स्पष्ट करतानाच त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच भाजपने त्यांचे हिंदुत्व काय हे स्पष्ट करावे, असे आव्हान दिले. ‘ना हिंदूचा, ना मुस्लिमांचा , भाजप कोणाचाही नाही’, अशी जोरदार टीकाही ठाकरे यांनी केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फटकारले.
एकूणच नाशिकच्या मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिले. महाविकास आघाडीबरोबर गेल्यापासून भाजपने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याचा आरोप सुरू केला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिंदुत्वावरून ठाकरे यांची नेहमीच कोंडी केली. यावर मी हिंदुत्व सोडलेले नाही याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला आहे.
काँग्रेसबरोबर गेल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्वाची मतपेढीत फूट पडली. काँग्रेस किंवा अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण मान्य नसलेल्या आक्रमक हिंदुत्ववादी मतदारांनी ठाकरे यांची साथ सोडून भाजप किंवा नंतर शिंदे यांच्या शिवसेनेला जवळ केले.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप विरोधी वातावरणाचा शिवसेनेला फायदा झाला. पण विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झंझावातापुढे ठाकरे यांच्या शिवसेनेचा पार धुव्वा उडाला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचे केवळ २० आमदारच निवडून आले. हिंदुत्व सोडल्याने किंवा अल्पसंख्याकांच्या जवळ गेल्याने ठाकरे यांचे नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढला जाऊ लागला. यामुळेच ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी हिंदुत्वावरूनच भाजपला टोचले. भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीकाही केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत टिकून राहायचे असल्यास ठाकरे यांना आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेण्याशिवाय पर्याय नाही. वक्फ विधेयकाच्या विरोधात ठाकरे गटाने मतदान केले होते. यावरून भाजपने ठाकरे यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. यातूनच ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देत हिंदू मतपेढी आपल्यामागे ठामपणे राहिल याची खबरदारी घेतली आहे.