अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांसह सर्वपक्षीय मोर्चेबांधणी सुरू आहे. राजकीय हालचालींना वेग आला. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीने भाजप वगळता इतर पक्षांसोबत मैत्री करण्याची तयारी दर्शवली. नव्या प्रयोगाची वंचितकडून चाचपणी केली जात असून स्थानिक स्तरावर नवे समीकरण उदयास येण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीतील गणितांवर पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडी स्वबळावर लढली. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. शिवाय २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकांमध्ये वंचितच्या मतांचा टक्का देखील घसरला. परंपरागत पतपेढी पक्षापासून दुरावली. त्यानंतर पक्षावर आलेली मरगळ दूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित आघाडीने तयारी सुरू केली आहे. केवळ अकोल्यापुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख महापालिका व जिल्हा परिषदांवर लक्ष केंद्रित केले.
राज्यात वंचितचा गड म्हणून अकोला जिल्हा परिषद ओळखली जाते. सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करून ॲड.प्रकाश आंबेडकरांनी अडीच दशकांपूर्वी सत्ता काबिज केली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय डावपेचात आजही त्या प्रयोगाचा प्रभाव कायम आहे. जि.प.वरील मजबूत पकड ॲड. आंबेडकरांनी कधीही सैल होऊ दिली नाही. जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा, महापालिका व नगर पालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. तरीही ग्रामीण भागातील भक्कम पाठबळाच्या आधारावर वंचितने भाजपसह शिवसेनेलाही धोबीपछाड दिल्याचा इतिहास आहे.
आता पुन्हा एकदा सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान वंचितपुढे राहील. अकोला जिल्ह्यात आढावा घेऊन संघटनात्मक पातळीवर नव्याने तयारी करण्याची जबाबदारी वंचित आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी घेतली. त्यांनी तालुका स्तरावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
प्रा. अंजली आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण सूतोवाच केले. स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप वगळता इतर पक्षांशी युती करण्याची तयारी असल्याचे प्रा. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांना चर्चेचे अधिकार दिले आहेत. मुंबईमध्ये काँग्रेस, छत्रपती संभाजीनगर व इतर काही ठिकाणी युतीसंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांना सोबत घेऊन मतांचा टक्का वाढविण्याचा वंचितचा प्रयत्न आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात इतर पक्षांसोबत जाण्याची वंचितची तयारी झाली. त्यातून परंपरागत मतपेढीसोबत इतर पक्षांच्या मदतीने जनाधार वाढवण्याचा नवा प्रयोग करण्याच्या हालचाली वंचितकडून सुरू झाल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेमध्ये देखील इतर पक्षांना सोबत घेण्याच्या दृष्टीने वंचित व काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे कळते. आता इतर पक्षाला सोबत घेण्याच्या चर्चेला कितमत यश येते, हे येणारा काळच स्पष्ट करू शकेल.
काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीसोबत चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी वंचितमध्ये चर्चेचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. योग्य प्रस्ताव आल्यास अंतिम निर्णय ॲड. प्रकाश आंबेडकर घेणार आहेत. काही ठिकाणी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप व त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी वगळता इतर पक्षांसोबत युती करण्याची वंचितची तयारी आहे. चर्चा करण्याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले. योग्य प्रस्ताव आल्यास युती संदर्भात निर्णय घेतला जाईल. – प्रा. अंजली आंबेडकर, नेत्या, वंचित बहुजन आघाडी.