पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तर सर्वांत तीव्र आवाज एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा आहे. केंद्राच्या वक्फ (सुधारणा) कायद्याविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या एका मोठ्या रॅलीचे नेतृत्व केल्यानंतर काही दिवसांतच पहलगाम येथे हल्ला झाला. तेव्हापासूनच ओवैसी पाकिस्तानवर टीका करीत आहेत आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करीत आहेत. तसेच सशस्त्र दलांना शेजारील देशातील दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे आवाहन करीत आहेत. या सर्व मुद्द्यांबाबत ओवैसी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलले आहेत…
संघर्ष कुठल्या मार्गाने जात आहे, असं तुम्हाला वाटतं?
परराष्ट्र सचिवांनी म्हटल्याप्रमाणे भारताच्या सशस्त्र दलांनी उद्दिष्ट साध्य केले आहे. सशस्त्र दलांनी फक्त तेच लक्ष्य निवडले आहे, जिथे दहशतवादी संघटना प्रशिक्षण देत होत्या. त्यांनी कोणत्याही लष्करी ठिकाणांना किंवा अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं नाही. जर पुढेही पाकिस्तान आक्रमक झाला, तर गप्प बसणार नाही ही सरकारची भूमिका योग्यच आहे. मला खात्री आहे की, भारतीय नेतृत्वाला सर्व परिस्थितीची जाणीव आहे. पण, मुद्दा असाही आहे की, जर पहलगाम हल्ला घडला नसता, तर आपण या परिस्थितीत पोहोचलो असतो का? हे पूर्णपणे पाकिस्तानपुरस्कृत हत्याकांडच होते हे लक्षात ठेवले पाहिजे.
जर तुम्ही दहशतवादी पाठवत राहिलात, तर कोणताही देश गप्प बसणार नाही. काश्मीरला गेलेल्या पर्यटकांना तुम्ही त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे केले हे खूप दुर्दैवी आहे. कलमा म्हणू न शकणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांच्या पत्नी, मुले आणि कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या कलम ५१ अंतर्गत आपल्याला स्वसंरक्षणाची परवानगी आहे. तसेच संविधानाच्या कलम ३५५ अंतर्गतदेखील हे स्पष्ट आहे की, जर एखाद्या राज्याविरुद्ध कोणतेही बाह्य आक्रमण झाले, तर लोकांचे संरक्षण करणे ही भारतीय संघाची जबाबदारी आहे.
राजनैतिक आघाडीवर सरकारच्या कृतीबद्दल काय मत आहे?
आतापर्यंत सीसीएस (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी)द्वारे जी काही पावलं उचलली गेली आहेत, ती आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. पाकिस्तानला पुन्हा एफएटीएफ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स)च्या ग्रे लिस्टमध्ये आणले पाहिजे. रेझिस्टन्स फोर्स (टीआरएफ) ही लष्कर-ए-तैयबा हीच संघटना आहे, त्याव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. या संघटनेवर अमेरिकेने प्रथम बंदी घातली पाहिजे. कारण- ते आमचे धोरणात्मक भागीदार आहेत. आमचा यूकेसोबत मुक्त व्यापार करार आहे. म्हणून आपण यूकेलाही या संघटनेवर बंदी घालण्यास सांगितले पाहिजे. यापुढेही पाकिस्तानवर निर्बंध लादले जातील याची खात्री करण्यासाठी अमेरिका आणि यूकेची मदत घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण प्रत्येक देश ‘टीआरएफ’वर बंदी घालेल याची खात्री केली पाहिजे. त्यानंतर आपण चिनाब आणि झेलम नदीवर धरणे बांधण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याला बरीच वर्षे लागतील; पण आपल्याला ते करावेच लागेल.
आपण हेदेखील विसरू नये की पहलगाम हल्ल्यामागील ते चार दहशतवादी अजूनही फरारी आहेत आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.
तणाव कमी झाल्यास भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी का?
गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे एक वक्तव्य सांगितले की, आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. पण मी त्यावेळी म्हटले की, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्ही एका काल्पनिक परिस्थितीबद्दल बोलत आहात. दुर्दैवाने पाकिस्तान भारताला अस्थिर व कमकुवत करण्यावर आणि देशात अधिक हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही पाकिस्तानवर, त्यांच्या सैन्यावर विश्वास ठेवू शकता का? सध्याच्या परिस्थितीत तशी परिस्थिती उद्भवताना दिसत नाही.
तुम्ही वक्फ कायद्यावर सरकारवर टीका केली होती; परंतु या मुद्द्यावर तुमच्यासह सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत आले आहेत. २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ च्या बालाकोट प्रतिहल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते.
उरी आणि बालाकोट या दोन्ही स्ट्राईकचे मी स्वागत केले. वक्फ कायद्याबद्दल आमची भूमिका ठामच आहे. आमच्या पक्षाला वाटते की, हा संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात तयार केलेला काळा कायदा आहे. आम्ही त्याविरुद्ध आमचा निषेध आणि कायदेशीर लढा सुरूच ठेवू; पण हा माझ्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे. जेव्हा एखादी बाह्य शक्ती देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करते, त्यावेळी आपण आपल्या राजकीय मतभेद बाजूला सारले पाहिजेत. आपल्या देशावर हल्ला झाला आहे आणि आपल्याला देशासाठी उभे राहिले पाहिजे.
मी जे काही बोलत आहे, ते मी गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहे. कोणाच्या ते लक्षात आले नसेल, तर ती माझी चूक नाही. मला कोणाकडूनही मान्यता मिळण्याची गरज नाही. जेव्हा माझ्या देशावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे तेव्हा एक भारतीय म्हणून मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी या गोष्टी प्रशंसा मिळविण्यासाठी बोलत नाही. राजकारणात मी नेहमीच मनापासून बोलतो.
सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही काय म्हटले?
मी बैठकीत म्हटले की, देशात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविल्यामुळे प्रचंड उत्साह आहे. सरकारने या उत्साहाचा वापर देशाला एकत्र आणण्यासाठी आणि आणखी मजबूत करण्यासाठी केला पाहिजे. आपण विविध गट आणि धर्मांमध्ये मतभेद निर्माण होऊ देऊ नये. ही एक ऐतिहासिक संधी आहे. काश्मिरींनी पहलगाम हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला आहे. आपण पाकिस्तानचा सामना केला पाहिजे; मात्र काश्मिरींना जवळ केले पाहिजे.
पूंछ येथे पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बळी पडलेल्यांना दहशतवादाचे बळी मानले पाहिजे. सरकारने त्यांच्या घरांची पुनर्बांधणी करावी आणि त्यांना सानुग्रह अनुदान दिले पाहिजे.
लष्कर कमांडर हाफिज अब्दुर रौफ यांनी फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये २०२५ पर्यंत आम्ही जिहाद करू, असे विधान केल्याचेही मी या बैठकीत म्हटले. जिहाद हा पवित्र शब्द भारतात रक्तपात करण्यासाठी वापरला जात आहे. अमेरिकेने रौफ याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मात्र, त्याच्या मागे पाकिस्तानी लष्करी अधिकारी उभे असताना दहशतवाद्यांच्या जनाजा नमाजाचे नेतृत्व करताना तो दिसतो. मी म्हटले आहे की, ही वस्तुस्थिती संपूर्ण जगाला सांगितली पाहिजे. पाकिस्तान काय आहे याचे हे योग्य वर्णन करीत सर्व सरकारी माहिती उर्दूमध्येही प्रसिद्ध केली पाहिजे.
मी हेही निदर्शनास आणून दिले की, तुर्की स्वतःच्याच देशात कुर्द दहशतवाद्यांवर बॉम्बस्फोट करीत आहे. आता कुर्द हेदेखील मुस्लीम आहेत. पण, तुर्की भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाकडे हिंदू आणि मुस्लीम म्हणून पाहत आहे. दहशतवाद हा दहशतवाद आहे. पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मुस्लीम आहेत. मी म्हणालो की, आपण त्यांना हे समजावले पाहिजे.