बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला बाजूला सारून आरजेडी सोबत घरोबा केला आणि बिहारच्या राजकारणात भूकंप झाला. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक आणि २०२५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने बिहारमध्ये लक्ष घातले आहे. सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त नितीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आणि जेडीयू यांचे ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकारण सुरू असल्याचे समोर येते. सम्राट अशोक यांच्या जयंतीचे हे २,३२८ वे वर्ष आहे. यानिमित्त अशोक यांची जात कोणती? कोणते जातसमूह त्यांच्यावर आपला हक्का सांगतात, यावरून बिहारमध्ये वाद सूरू झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे २ एप्रिल रोजी बिहारच्या दौर्‍यावर येत आहेत. राज्यातील सत्ता गेल्यापासून अमित शहा यांनी अनेकदा बिहारचा दौरा केला. शहांच्या दौऱ्यावर नितीश कुमार यांनी फिरकी घेतली. सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात पटना येथे नितीश कुमार म्हणाले, “पुढील काही दिवसांत दिल्लीवरून नेते येतील. सम्राट अशोक यांच्याबाबत चुकीची माहिती देऊन तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी ते समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.”

जनता दल (युनायटेड) पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार स्वतःला केंद्रात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काही काळापासून करत आहेत. यासाठी त्यांनी भाजपासोबत काडीमोड घेत जुना सहकारी आरजेडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी भाजपासोबत सत्ता भोगणारे नितीश कुमार आता भाजपावर तुटून पडताना दिसतात. पटना येथील कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, या लोकांनी (भाजपा) स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधीही सहभाग घेतला नव्हता. आता सम्राट अशोक यांचे नाव घेऊन ते काही जातींना वेगळे करण्याचा प्रयत्न करतील. मी कधीही जातीवरून लोकांना विभागण्याचे काम केले नाही.

चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू असलेल्या अशोक यांचे भारतीय इतिहासात अनन्यसाधारण असे स्थान आहे. इसवी सन पूर्व २६८ आणि २३२ दरम्यान अशोक यांचे राज्य असल्याचे मानले जाते. सम्राट अशोक यांचे राजकीय मूल्य ओळखणारा भाजपा हा पहिलाच पक्ष आहे. भाजपाने २०१५ साली सम्राट अशोक यांच्या २,३२० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने पोस्टल स्टँपचे अनावरण केले होते. त्यानंतर बिहार मधील काही जातींनी सम्राट अशोक यांच्यावर हक्क सांगण्यास सुरुवात केली. यामध्ये विशेष करून ओबीसी प्रवर्गातील कुशवाहा जात सर्वात पुढे होती. आम्ही सम्राट अशोकाचे वशंज आहोत, असे कुशवाहांचे मानने आहे. तसेच द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बिहार मधील एका मोठ्या नेत्याने सांगितले की, सम्राट अशोक हा बिहारमधील ओबीसी वर्गाचे प्रेरणास्थान आहे. अशोकाकडे पाहून त्यांना प्रेरणा मिळते.

जानेवारी २०२२ मध्ये, अशोक यांच्याबाबत एक वाद उफाळून आला होता. माजी सनदी अधिकारी, भाजपाचे पदाधिकारी आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, नाटककार दया प्रकाश सिन्हा यांनी अशोक बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले. नवभारत टाइम्स या वृत्तपत्राशी बोलताना सिन्हा म्हणाले, “सम्राट अशोक या नाटकासाठी मी संशोधन करत असताना माझ्या लक्षात आले की, सम्राट अशोक आणि मुघल औरंगजेब यांच्यात साम्य होते. दोघांनीही सुरुवातीच्या कालखंडात दुःष्कृत्य केले. त्यानंतर त्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी धर्माचा आधार घेतला. धर्माचा बुरखा ओढवून घेतल्यामुळे लोकांसमोर त्यांची दु:ष्कृत्य आली नाहीत.” सिन्हा यांना सम्राट अशोका याच नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

सिन्हा यांच्या विधानानंतर बिहार मधील तीन प्रमुख पक्षांचे कुशवाहा समाजाचे नेते सम्राट अशोक यांची बाजू उचलून धरण्यासाठी पुढे आले. भाजपाचे नेते, केंद्रीय पंचायत राज मंत्री चौधरी, जेडीयूचे बंडखोर नेते उपेंद्र कुशवाहा, आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध मेहता यांनी सिन्हा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. बिहारमध्ये यादव यांच्यानंतर प्रभावशाली असलेली कुशवाहा हा दुसर्‍या क्रमांकावर असलेला जातसमूह आहे. कुशवाहा स्वतः ला मौर्य यांचे थेट वशंज असल्याचे समजतात.

सिन्हा यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर होत्या. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपाविरोधात या विषयावर रान पेटवल्यामुळे भाजपाला मौर्य मतदारांची चिंता वाटत होती. त्यासाठीच सिन्हा यांच्यावर लेकांच्या भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. बिहारचे माजी मुख्यमंत्री मांझी, तेव्हाचा भाजपाचा सहयोगी जेडीयू आणि आरजेडी पक्षाने सिन्हा यांना दिलेला साहित्य अकादमीचा पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What was the caste of emperor ashoka amit shah rally in bihar politics pretext of emperor ashoka kvg
First published on: 31-03-2023 at 22:40 IST