राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ‘राष्ट्रीय सेवा भारती’ (RSB) ही संघटना सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संघटनेशी जोडल्या गेलेल्या अनेक एनजीओंची जयपूर येथे ७ आणि ८ एप्रिल रोजी परिषद भरणार आहे. संघाशी निगडित असलेल्या अनेक स्वयंसेवी संघटनांची ही सर्वात मोठी परिषद असल्याचे सांगण्यात येत आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे या परिषदेचे उद्घाटन करतील. तर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे हे आभारप्रदर्शनाचे भाषण करतील. ‘स्वयंपूर्ण आणि समृद्ध भारत’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय सेवा संगम’ असे नाव या परिषदेला देण्यात आले आहे. देशभरातून १००० एनजीओंचे ५००० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतात सामाजिक क्षेत्रात ज्या एनजीओ काम करतात, त्यांच्यावर डाव्या विचारांच्या एनजीओंचा प्रभाव आहे, असे संघाचे मानणे आहे. सामाजिक क्षेत्राची व्याप्ती पाहता या क्षेत्रात संघानेही काही वर्षांपासून लक्ष घातले आहे. सामाजिक क्षेत्र हे भारतीय संस्कृतीच्या अगदी जवळचे मानले जाते, त्यामुळेच संघ आता यातही सक्रिय होताना दिसत आहे. भाजपाप्रणीत केंद्र सरकारने एका बाजूला इतर एनजीओंना होणाऱ्या परकीय मदतनिधीला बांध घातला असतानाच संघाकडून ही परिषद भरविण्यात येत असल्यामुळे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक एनजीओंनी परकीय योगदान नियमन (Foreign Contribution Regulation Act – FCRA) कायद्यांतर्गत नोंदणी केलेली होती. मात्र परकीय निधी जमवताना अपहार झाल्याचा आरोप करत मोदी सरकारने अनेक एनजीओंची एफसीआरएची नोंदणी रद्द केली होती. त्यामुळेच देशातील अनेक भागांत कार्यरत असलेल्या एनजीओंचे कामकाज थांबलेले आहे.

हे वाचा >> पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली; सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

‘राष्ट्रीय सेवा भारती’ संघटनेवर संघाने लक्ष केंद्रित केल्यानंतर या संघटनेला जवळपास एक हजार एनजीओ आणि बचत गटांची साथ मिळाली आहे. विशेषतः करोना काळात आरएसबीने लोकांमध्ये जाऊन काम केले. महामारीच्या काळात संघाचे काम थांबले असताना आरएसबीच्या कामांमुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यात संघाला यश आले.

संघ परिवाराकडून करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याला औपचारिक संघटनेचे स्वरूप देण्यासाठी संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी १९८० साली राष्ट्रीय सेवा भारतीची स्थापना केली. आरएसबीचा मुख्य उद्देश हा त्यांच्याशी संबंधित संस्था आणि लोकांना सहकार्य करणे, प्रशिक्षण, संशोधन आणि विश्लेषण करणे यावर आधारित आहे. आरएसबीशी निगडित अनेक एनजीओ या आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या विषयांवर काम करत आहेत. यासोबतच सामाजिक कार्य, आपत्कालीन मदत आणि बचाव कार्य यासाठीचे प्रशिक्षण देण्याचे कामही आरएसबीकडून करण्यात येते.

लोकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे एकमात्र उद्दिष्ट न ठेवता आपल्या लाभार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्व, समानता आणि राष्ट्रवादाचा विचार रुजविण्याते प्रयत्न राष्ट्रीय सेवा भारती करत असते. राष्ट्रीय सेवा भारतीचे अध्यक्ष पन्नालाल भन्साळी यांनी सांगितले की, मागच्या वर्षी आम्ही २५ हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. संघटनेकडून ४३ हजार ०४५ सामाजिक उपक्रम सुरू आहेत. यामध्ये १६,१८४ कार्यक्षमता प्रकल्प आहेत, १०,५१३ आरोग्य प्रकल्प, ६,८०५ बचत गट प्रकल्प आणि ९,५४३ सामाजिक प्रकल्प सुरू आहेत. भन्साळी पुढे म्हणाले की, देशभरातील ११७ जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या मदतीने १२ हजार १८७ बचत गटांचे प्रकल्प सुरू आहेत, ज्यांचे जवळपास १२ हजार सदस्य आहेत. यांपैकी २,४५१ बचत गट हे सक्रिय असून पूर्णतः आत्मनिर्भर आहेत.

हे देखील वाचा >> जागृत हिंदू युद्धात आक्रमक होणे नैसर्गिक! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत

राष्ट्रीय सेवा भारतीचे प्राथमिक लक्ष्य हे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेला बळकटी देण्यासाठी काम करणे आहे. त्यासाठी देशातील लोकांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न संघटनेकडून सुरू आहेत. सामंजस्यपूर्ण, सामर्थ्यपूर्ण आणि आत्मनिर्भर समाज बनविणे हे संघटनेचे निहित लक्ष्य आहे, असेही भन्साळी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With rss pushing social sector outreach rashtriya sewa bharati set to hold its ngos biggest huddle kvg
First published on: 24-03-2023 at 16:35 IST