डाळभात, दहीभातानंतरची भाताची आवृत्ती म्हणजे तमाम गृहिणींची प्यारी, मुगाची खिचडी. ती अशी आवडती का आहे याचं उत्तर अगदी साधंसोपं आहे, ते म्हणजे ती आयत्या वेळेला कामाला येते आणि अडीअडचणीच्या वेळी श्रम वाचवते. प्रमाण कितीही वाढवलं तरी कष्ट वाढत नाहीत. आणि खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान मिळण्याची गॅरंटी.

जेवढे तांदूळ, तेवढीच किंवा मूठभर जास्तीची मुगाची डाळ घेऊन, दोन्ही घटक एकत्र करून फोडणीमध्ये परतलं आणि पाणी आणि तिखट-मीठ-मसाला घालून शिजवलं की झाली खिचडी तयार. फक्त कुणी ती वर शिजवेल तर कुणी चक्क कुकरमध्येच फोडणी देऊन, पाणी घालून, शिट्टय़ा देऊन खिचडी आणखी सोपी करून टाकेल. अशी खिचडी वर तूप, एखादा भाजलेला पापड, लोणच्याची फोड आणि नंतर वाटीभर ताक एवढय़ामध्ये कधी कधी रात्रीचं पोटभरीचं जेवण निभवण्याची ताकद असते.

दमछाक झाल्यावर, प्रवासातून आल्यावर, फारशी भूक नाही, पण जेवायचं तर आहे अशा वेळी किंवा भूक आहे, पण फारसे कष्ट करायचे नाहीत अशा वेळी ही खिचडी हमखास उपयोगाला येते. त्याशिवाय खिचडीचे आणि खाणाऱ्याचे लाड करायचे असतील तर मग खिचडी वेगवेगळी रूपं धारण करते. फोडणीच्या तेलाची जागा तूप घेतं. खिचडीला कांदा, लसणाची चव येते. कुणी लाल मसाल्याऐवजी हिरवी मिरची वापरतं, कुणी खिचडीच्या पोटात आणखी दोन भाज्या वाढवतं. वाढताना वरून कोथिंबिरीची सजावट होते. जोडीला वाटीत कढी येते. वेळ असेल आणि जिव्हादेवीची आराधनाच करायची असेल तर खिचडी अशी सजून धजून समोर येते. पण एरवी मुगाची खिचडी ही ‘पटकन् टाकायची’च गोष्ट असते. त्यातही वैविध्य हवं असेल तर मुगाच्या डाळीची गुजराती पद्धतीची खिचडी करताना नेहमीसारखी डाळ-तांदळाच्या प्रमाणात डाळ मूठभर जास्तीची घेऊन ही खिचडी करायची असते, पण वाढताना ती चक्क डाळ वाढायच्या पळीने वाढायची असते. कारण तिच्यात डाळ-तांदूळ कणभर आणि पाणी मणभर असंच प्रमाण घ्यायचं असतं.

एक वाटी डाळ-तांदूळ असतील तर त्यात चार-पाच वाटी पाणी घालून ही खिचडी चांगली गिरगिरीत शिजवायची. एकदम मऊ-मऊ आणि भरपूर पातळ अशा या खिचडीत डाळ-तांदूळ एकजीव होतात. तिखट-मीठ किंवा मीठ-मिरचीच्या चवीने जिभेला चांगली तरतरी येते. मऊमऊ, गरमगरम अशी चक्क चमच्याने खायची ही पातळ खिचडी. पण ती सगळ्याच मराठी माणसांना आवडतेच असं नाही. मुख्यत: ज्यांना मोकळा, फडफडीत भात खायला आवडतो, त्यांना ही खिचडी अजिबात आवडत नाही. काही ठिकाणी हीच खिचडी मुगाची डाळ न वापरता, त्याऐवजी तुरीची डाळ वापरून करतात. त्याशिवाय खिचडीत वैविध्य आणायचं असेल तर तांदळाचं एक प्रमाण घेऊन, म्हणजे समजा वाटीभर तांदूळ घेतले तर मुगाची डाळ, तुरीची डाळ, हवी तर मसुरीची डाळ अशा डाळी मिळून दोन वाटी म्हणजे तांदळाच्या दुप्पट घ्यायच्या आणि त्याची नेहमीच्या खिचडीसारखी शक्यतो मऊ, पातळ अशी खिचडी करायची. त्यात हवं तर लाल तिखट घाला किंवा हिरवी मिरची घाला, काहीही घातलं तरी ही खिचडी चांगलीच लागते.

खिचडीचा आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे कानडी बिशिब्याळीहुळीअन्ना. बिशी म्हणजे गरम, ब्याळी म्हणजे डाळ, हुळी म्हणजे आंबट, अन्ना म्हणजे तांदूळ. थोडक्यात, डाळ-तांदूळ घालून केलेला गरमगरम खायचा आंबटगोड भात. या भाताचा थाटही खिचडीचाच असतो. ती करताना फोडणीमध्ये आधी कढीपत्ता आणि सगळ्या भाज्या चांगल्या परतून घेतात. लाल तिखट आणि गोडा मसाला घालतात. खरं तर या भाताचा वेगळा मसालाही केला जातो. पण तो नसेल तर आपले नेहमीचे मसाले घ्यायचे. तांदळाच्या दुप्पट तुरीची डाळ घेऊन ते एकत्र करून या फोडणीत परततात. मग त्यात चिंचेचा कोळ, गूळ घालतात आणि भरपूर पाणी घालून उकळतात किंवा चक्क शिट्टय़ा देतात. तूप घालून या गरमगरम भाताची चव अफलातून लागते. त्याशिवाय हुळीअन्ना, चित्रान्ना असे भाताचे कानडी प्रकार आहेत, पण अर्थातच ते खिचडी या प्रकारापेक्षा ‘फोभा’ला जास्त जवळचे आहेत.

खिचडीच्या जवळ जाणारा, पण खिचडी नाही, मसालेभाताच्या जवळ जाणारा पण मसालेभात नाही असाही भाताचा एक साधासोपा इंटरेस्टिंग प्रकार आणीबाणीच्या वेळेला उपयोगी पडतो. त्यासाठी फार काही करावंही लागत नाही. फक्त नेहमीसारखे तांदूळ (फक्त तांदूळ, डाळ नाही) धुऊन घ्यायचे. भरपूर कांदे-बटाटे घ्यायचे. बटाटे मोठे मोठे चिरायचे. कांदे निम्मे एकदम बारीक आणि निम्मे मोठेमोठे चिरायचे. कुकरमध्ये फोडणी करायची. त्या फोडणीत आधी बारीक चिरलेले कांदे, मग मोठे चिरलेले कांदे परतून घ्यायचे. मग बटाटे परतून घ्यायचे. आवडत असतील तर थोडा टोमॅटोही घालायला हरकत नाही. ते झाल्यावर धुऊन निथळत ठेवलेले तांदूळ घालून परतून घ्यायचे. चवीनुसार लाल तिखट, मीठ घालायचं आणि पाणी मात्र हातचं राखून घालायचं. पाणी कमी घालून जास्त शिट्टय़ा दिल्या की हा भात एकदम छान शिजलेला असतो आणि मोकळाही झालेला असतो. कांदा-बटाटय़ाची चव त्यात उतरलेली असते. कांदा-बटाटय़ाला तिखट-मिठाची चव लागलेली असते. म्हणजे सगळे घटक एकमेकांबरोबर एकजीव आहेत, पण तरीही आपलं अस्तित्व टिकवून आहेत असं ते आघाडीचं सरकार तयार झालेलं असतं. ती खिचडी नसते, मसालेभात नसतो, पण तसंच काहीतरी असतं. टोमॅटोच्या साराबरोबर हा भात भन्नाटच लागतो. तो करताना तेलाच्या ऐवजी तूप वापरलं तर सोने पे सुहागा.

डाळ-तांदळाची खिचडी या ना त्या प्रकारे इतक्या वेळा खाल्लेली असते की, ती लक्षात ठेवायचीही गरज नाही. पण तरीही कधी तरी ती इतकी अविस्मरणीय असते.. अशी उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्य़ात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघून दुसऱ्या दिवशी ‘हेमकुंड साहेब’ला ४,६३२ किलोमीटर उंचीवर, कडाक्याच्या थंडीत तिथल्या गुरुद्वारात प्रसाद म्हणून जी गरमगरम, खायची नव्हे तर पेल्यातून प्यावी लागते अशी जी खिचडी मिळते, ती तिथे जाणारा, ती खाणारा कुणीही, कधीही विसरूनच शकत नाही.
वैशाली चिटणीस –