हिटलरने जर्मनी हे राष्ट्र एक केले. बलिष्ठ केले. तेथे आर्य संस्कृती प्रस्थापित केली. महिलांचे स्थान घरात. त्यांनी छान गुटगुटीत बालकांना जन्म द्यावा. त्यांचे पालनपोषण करावे. वंश वाढवावा आणि पुरुषांनी बाहेरच्या जगात पराक्रम गाजवावा, ही त्याची शिकवण. वंश हा रक्तातूनच प्रवाहित होत असतो. तेव्हा रक्त शुद्ध राहणे महत्त्वाचे. हा शुद्ध वंश म्हणजे जर्मन आर्याचा. तो महत्त्वाचा; पण आजवर त्यालाच दडपण्याचे प्रयत्न झाले. सारे जग त्याच्याविरुद्ध होते. त्यात पुढाकार ज्यूंचा. त्यांनी जर्मन राष्ट्राला पंगू बनविले. अत्यंत घातकी, धूर्त, लबाड आणि क्रूर अशी ती जात. त्यांना ठेचलेच पाहिजे. ते केले, तरच जर्मनी बलवान बनू शकेल. हे सगळे अमान्य असणारे लोक म्हणजे देशद्रोही. त्यात मार्क्‍सवादी आले, बोल्शेविक आले. त्यांनाही चेचले पाहिजे. तरच राष्ट्र बलवान होऊ  शकेल. हा हिटलरचा, त्याच्या नात्झी तत्त्वज्ञानाचा सर्वसाधारण गोषवारा.

आता असा राष्ट्राला मोठे करण्याचा विचार मांडणारी व्यक्ती म्हणजे थोरच असणार. तर हिटलर तसा होता. शूर सेनानी होता आणि त्याहून अधिक म्हणजे तो खरा राष्ट्रभक्त होता. असे सांगत अनेक जण आजही हिटलरला आदर्श मानताना दिसतात. भारतीय स्वातंत्र्यसैनिक हे वांशिकदृष्टय़ा हीन आहेत. वैदिक संस्कृती ही मुळात आर्य संस्कृती असली, तरी नंतर त्यांच्या रक्तात भेसळ झाली, ही हिटलरची भारताबद्दलची मते असली, तरी भारतात त्याची गौरवगीते गाणारे अजूनही सापडतात. त्यांच्या दृष्टीने हिटलरचे क्रौर्य, त्याने केलेले हत्याकांड हे लोकहिताचेच होते. आज तर, तसे काही हत्याकांड झालेच नव्हते, असाही प्रचार केला जातो व त्यावरही विश्वास ठेवणारे लोक आहेत. हिटलरला ते खरा राष्ट्रनेता मानतात व आपणही त्याचाच कित्ता गिरवावा असे त्यांना वाटते; परंतु हिटलरच्या मनात खरोखरच लोकांचे हित – अगदी शुद्ध रक्ताच्या जर्मन जनतेचे हित होते का? काय भावना होती त्याची जनतेबद्दल?

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”
In North Maharashtra clash over Nashik in Mahayuti Only Nandurbar candidate announced in mahavikas aghadi
उत्तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये नाशिकवरून संघर्ष… महाआघाडीत केवळ नंदुरबार उमेदवार जाहीर… कोणते मुद्दे ठरणार कळीचे?

हिटलरच्या मनातील लोकांबाबतची – म्हणजे अर्थातच शुद्ध आर्यवंशी जर्मनांबाबतची. ते सोडून बाकीचे सगळे त्याच्या दृष्टीने लोक नाहीतच. ते किडे. तर या जर्मन लोकांबाबतची मते समोर येतात ती ‘माइन काम्फ’मधील प्रोपगंडाविषयक लिखाणातून. राष्ट्र आणि लोक असा एक फरक त्याच्या विचारांतून सतत तरळताना दिसतो. तो राष्ट्राचा विचार करतो आणि राष्ट्र हे लोकांसाठी व लोकांचे नव्हे, तर लोक हे राष्ट्रासाठी आहेत असे मानताना दिसतो. आजच्या प्रोपगंडासंपृक्त काळात हे सारे नीट समजून घेणे अत्यावश्यक आहे.

हिटलर स्पष्टच सांगतो, की ‘बहुसंख्य राष्ट्रांचे स्वरूप आणि त्यांचे दृष्टिकोन हे बायकी असतात. त्यामुळे संयमी विचारबुद्धीऐवजी त्यांचे विचार आणि वर्तन यांवर राज्य करते ती भावनाशीलता.’ राष्ट्रे बायकी असतात. ती भावनेने चालतात. याचा अर्थ स्पष्ट आहे, की बहुसंख्य लोक हे बायकी असतात. हे हिटलरचे सर्वसामान्यांविषयीचे मत होते. तो सांगतो, की लोकांच्या मनातील भावनाही फार गुंतागुंतीच्या नसतात. ते केवळ प्रेम आणि द्वेष, चांगले आणि वाईट, खरे आणि खोटे अशा ‘बायनरी’मध्येच विचार करू शकतात. थोडे हेही असेल, थोडे तेही असेल, असा विचारच नसतो त्यांच्याकडे. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जर्मनांची क्रूर हूण अशी प्रतिमा उभी केली होती. तो प्रोपगंडा यशस्वी का ठरला? तर हिटलर सांगतो, लोकांच्या भावना या नेहमीच टोकाच्या असतात. त्यामुळे जर्मन अत्याचाराच्या कथांवर त्यांचा विश्वास बसला.

हिटलरचे म्हणणे असे होते, की ब्रिटिशांच्या प्रोपगंडामुळे जर्मनीचे मनोधैर्य खच्ची झाले. आपण त्यापासून धडा घेतला पाहिजे आणि प्रोपगंडाची तशी प्रभावी तंत्रे वापरली पाहिजेत; पण त्याचा कोणावर वापर करायचा? हिटलरने अगदी खोलात जाऊन याचा विचार केला आहे. तो लिहितो, ‘प्रोपगंडाचे लक्ष्य हे नेहमीच सर्वसामान्य जनता असली पाहिजे.. एखाद्या व्यक्तीला माहिती वा आदेश देणे हा प्रोपगंडाचा हेतू नसतो, तर विशिष्ट गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हे त्याचे उद्दिष्ट असते. त्या गोष्टींचे महत्त्व केवळ प्रोपगंडाद्वारेच लोकांच्या लक्षात आणून देता येते.’ प्रोपगंडाच्या या कलेचे स्वरूप कसे असले पाहिजे? तर ‘विशिष्ट बाबींची आवश्यकता, विशिष्ट तथ्यांची वास्तवता, आवश्यक असलेल्या गोष्टींचे न्याय्य स्वरूप याबाबत लोकांच्या मनात दृढ विश्वास निर्माण करण्यासाठी त्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे आणि जोरदारपणे लोकांच्या मनात घुसविल्या पाहिजेत.. हा प्रोपगंडा लोकांच्या विवेकबुद्धीला व तर्कशक्तीला नव्हे, तर भावनांना भावला पाहिजे.’ म्हणून मग तो लोकप्रिय ढंगातच सादर केला पाहिजे आणि तो जर लोकसमूहाला उद्देशून असेल, तर त्याची बौद्धिक पातळीही फार उंच असता कामा नये.

हिटलरचे सांगणे आहे, की कमीत कमी बुद्धी असलेल्या माणसाच्या डोक्यावरून जाणार नाही एवढी प्रोपगंडाची उंची हवी. तो जितका त्याच्या भावनांना भिडेल, तितका तो अधिक यशस्वी ठरेल. त्यासाठी आणखी एक काळजी घेणे आवश्यक असते. हिटलर सांगतो, ‘सर्वसामान्य लोकांची ग्रहणशक्ती ही अत्यंत माफक असते. बुद्धीनेही कमी असतात ते; पण त्यांची विस्मरणशक्ती मात्र प्रचंड असते.’ म्हणून ‘प्रभावी प्रोपगंडा हा मोजक्याच मुद्दय़ांपुरता मर्यादित असला पाहिजे. शक्यतो त्यात एकसाची प्रतिमांचा वापर करण्यात आला पाहिजे आणि तुम्हाला त्यातून जे काही सांगायचे आहे ते अगदी शेवटच्या माणसाला समजत नाही, तोवर सतत त्याचीच टिमकी वाजवत राहिली पाहिजे.’ कोणत्याही प्रचार मोहिमेत पाहा, एखादी घोषणा अशी असते, की ती सतत आपल्या डोळ्यांसमोर राहील याची काळजी घेतली गेलेली असते. तीच ती घोषणा फिरवून फिरवून मांडलेली असते. याचे कारण त्या पक्षाकडे वा संस्थेकडे दुसरी घोषणा तयार करण्यासाठी माणसे वा पैसे नसतात असे नसते. त्यामागे हे हिटलरचे तंत्र असते.

हिटलरने प्रोपगंडाबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो विचारतो, ‘समजा, एखाद्या नव्या ब्रँडच्या साबणाची जाहिरात आपण करीत आहोत. त्या जाहिरातीत दुसऱ्या स्पर्धक ब्रँडच्या साबणातील चांगल्या गुणांची स्तुती आपण केली तर? काय म्हणाल तुम्ही त्या जाहिरातीच्या पोस्टरला?.. राजकीय जाहिरातीचेही असेच असते.’ येथे हिटलर आपल्याला हे सांगतो, की प्रोपगंडामध्ये फक्त एकच बाजू बरोबर असते आणि ती आपली असते. त्याच्या म्हणण्यानुसार, पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीची मूलभूत चूक अशी होती, की ‘युद्धाची संपूर्ण जबाबदारी जर्मनीची नाही’ असे तिचे नेते म्हणत राहिले. यातून संदेश असा गेला, की जर्मनीही काही प्रमाणात युद्धाला जबाबदार होती. प्रोपगंडामध्ये अशा ‘अर्धवटपणा’ला स्थान नाही. सर्वसामान्य लोक काही मुत्सद्दी वा राज्यशास्त्राचे प्राध्यापक नसतात. त्यांना एखाद्या गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करता येत नसतो. आपलीही थोडीशी चूक आहे असे म्हटले की ते गोंधळात पडतात. आपली चूक कुठे संपते आणि शत्रूची कुठे सुरू होते हे समजण्याची अक्कल नसते त्यांच्यात आणि अशात समोरचा शत्रू जर सगळ्याच चुका आपल्या पदरात घालत असेल, तर मग त्यांना आपलेच सारे चुकीचे वाटते. तेव्हा असे मुळीच करता कामा नये, असे हिटलरने निक्षून सांगितले आहे. आजचे प्रोपगंडापंडितही ही ‘शिकवणूक’ विसरलेले नाहीत. समोरची व्यक्ती असो वा समूह, धर्म-जात असो वा राष्ट्र.. चुकीचे असते, आक्रमक असते, अनैतिक असते, अन्याय करणारे असते ते तेच. हीच गोष्ट सातत्याने जनतेच्या माथी मारली जाते. या सर्व शिकवणुकीतच आपल्याला हिटलरच्या ‘बिग लाय’ या तंत्राचे मूळ सापडते.

‘माइन काम्फ’मधील ‘व्हाय द सेकंड राईक कोलॅप्स्ड्’ या प्रकरणात त्याने या ‘महाअसत्या’च्या तत्त्वाचा ऊहापोह केला आहे. ते करतानाही तो वापरत होता ती प्रोपगंडाची तंत्रेच. ज्यू प्रचंड खोटारडे असतात. जर्मनीच्या पराभवाला खरे तर ते आणि त्यांचे मार्क्‍सवादी साथीदार जबाबदार; पण त्यांनी त्याचे खापर फोडले ल्युडेन्डॉर्फ या ‘महान सेनानी’वर. हा ज्यूंचा कावा असल्याचे हिटलरचे मत. ते मांडताना त्याने ‘बिग लाय’ हे तत्त्व स्पष्ट केले. ते बरेच झाले. त्यामुळे हिटलरच्या प्रोपगंडाचा पाया तरी आपल्याला समजला..

रवि आमले

ravi.amale@expressindia.com