lp34आमच्या प्रेमाच्या प्रयोगांची दास्तान ऐकून एके दिवशी आमची अतिशय चांगले स्नेही आमच्याशी वाद घालण्याच्या इराद्याने बैठक मांडून बसले. निरपेक्ष प्रेम, प्रेमसिंचन, चराचराला प्रेम अर्पावे, इ. इ. शब्दांचा त्यांना अगदी उबग आला होता.

‘प्रेम वगैरे सर्व काव्यात ठीक आहे हो. प्रत्यक्षात असं निरपेक्ष प्रेम सत्य नसतं आणि व्यवहार्यही नसतं. ही सगळी बोलाची कढी आणि बोलाचा भात!’

त्यांचा ठाम युक्तिवाद.

‘अहो, पण आपल्या सर्वानाच कधी ना कधी लाभावीण प्रीतीचा अनुभव येतोच ना..’ आमचा प्रेमळ प्रतिवाद.

‘कसली हो लाभावीण प्रीती? कोणीही आपली जात, धर्म, देश यांपलीकडे जाऊन प्रेम करत नाही. एवढंच कशाला, वेळ पडली तर प्रत्येकाला आपला जीवच प्यारा असतो. बिरबलाच्या गोष्टीतील माकडीण कशी, नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यावर आपल्या पिल्लाला पायांखाली दाबते, तसं आपल्या सर्वाचंच प्रेम स्वार्थी असतं.’

अत्यंत आक्रमकपणे आपला तोफखाना त्यांनी चालूच ठेवला.

‘तुम्ही सांगा, कसोटीची वेळ आली, तर तुम्ही कोणाची निवड कराल, एका भारतीय बांधवाची की एखाद्या अनोळखी परदेशी बांधवाची? प्रेमाचे सिंचन करण्याची वेळ आली तर कुणावर कराल, तुमच्या मुलीवर की दुसऱ्याच्या मुलीवर?’

‘आणि हो, उगाच माझं तोंड बंद करायला गांधीगिरीने उत्तर देऊ नका बरं.’

आता आम्हाला आमची शस्त्रे बाहेर काढण्यावाचून पर्यायच नव्हता.

‘तुम्ही भारताचे प्रचंड अभिमानी आहात ना?’

‘हो तर, यात काही शंका?’

‘छे, छे, अहो, शंका कसली, आम्हाला तर खात्रीच आहे. आणि हे ही माहिती आहे की प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्यघटनेबद्दल नितांत आदर असतो.’

आमचे स्नेही जरा अस्वस्थ झाले. ‘म्हणजे काय? आम्हाला आपल्या राज्यघटनेबद्दल आदर आहेच. एवढंच नाही, तर आम्हाला १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांच्यातला फरकही कळतो; बरं का! १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन- आपली राज्यघटना कार्यान्वित करण्याचा दिन.’ त्यांनी विजयी मुद्रेने आमच्याकडे पाहिले. पण आम्ही कसले खवचट! त्यांचा आनंद काही फार टिकू दिला नाही.

‘मग राज्यघटनेचे कलम ५१(क) तुम्हाला माहीत असेलच?’

‘नाही. एवढे तपशील माहिती नाहीत.’

‘असू दे. आम्हीच सांगतो. आपल्या राज्यघटनेचे कलम ५१(क ) हे भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगते. ती अशी,

प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की

क) भारतीय संविधानाचे पालन करणे व तत्प्रणीत आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

ख) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढय़ास स्फूर्ती मिळाली, त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.

ग) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे रक्षण करणे.

घ) आवाहन केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावणे.

ड) धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भातृभाव वाढीला लावणे.

च) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे.

छ) अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यांसुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे.

ज) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.

झ) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.

ट) राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी चढत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.

ठ) मात्यापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यान आपले अपत्य किंवा पाल्य याला यथास्थिती शिक्षणाच्या संधी देणे.

‘आमचा राज्यशास्त्राचा तास कशासाठी?’

‘हा राज्यशास्त्राचा तास नाही, ही निरपेक्ष प्रेमाची संकल्पना आहे. आपण प्रत्येकाने चांगलं माणूस व्हावं, देश, संस्कृती, निसर्ग यांच्याबद्दल आदरभाव व कृतज्ञभाव बाळगावा ही घटनेची अपेक्षा आहे. आपल्या प्राचीन ऋणप्रधान संस्कृतीची सर्व मूल्ये या मूलभूत कर्तव्यांच्या संकल्पनेत उतरली आहेत. अशा कृती करणं म्हणजेच निरपेक्ष प्रेम करणं.’

‘आता संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करण्यात कसं काय निरपेक्ष प्रेम होणार?’ ते कुतूहलाने म्हणाले.

‘कसं नाही? आपल्या देशात इतक्या धर्माचे, पंथांचे, जातींचे लोक राहतात, वेगवेगळ्या भाषा बोलतात, भिन्न भिन्न चालीरीतींचे पालन करतात, नाना प्रकारचे अन्नपदार्थ बनवतात, आपापले सण साजरे करतात. या सर्वाचे आपुलकीने जतन करणे, प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होणे हे प्रेमच नाही का? कुठल्याही स्त्रीबद्दल आदरभाव दाखवणे, तिला सन्मानाने वागवणे हे प्रेम नाही? सर्व  धर्माविषयी आदरभाव बाळगणे हे किती उन्नत मनाचे लक्षण आहे! प्रेम ही काय शयनगृह व बागबगिचे यांची मक्तेदारी आहे? डोळसपणा, विवेकीपणा, कृतज्ञता, मानवता हे प्रेमभावनेनेच पैलू नाहीत का? प्रेम म्हणजे निर्मळ मनाचा आविष्कार!’

त्यांना हे सर्व अनपेक्षित होतं. परिणामी, त्यांच्याकडचे वादाचे मुद्दे त्याक्षणीच संपले. मात्र, मनात निश्चित संवाद सुरू झाला. प्रेम या संकल्पनेच्या व्याप्तीविषयी त्यांच्या मनाची कवाडे खुली होऊ लागली. आमचे काम झाले होते.

आपल्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या व त्यानिमित्ताने कलम ५१(क) मधील मानवतेच्या गाथेच्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. मीनल कातरणीकर –