पालकमंत्री गिरीश बापट यांचे प्रतिपादन

पुणे : स्वयंपाक घरातील चुलीमध्ये लाकडाचे जळण म्हणून होणारा वापर हा महिलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे उज्ज्वला योजना देशभरात राबविण्यात येत आहे. आजवर संपूर्ण देशभरात ३ कोटी घरांमध्ये उज्ज्वला योजनेद्वारे गॅस जोडणी देण्यात आली असून आणखी पाच कोटी घरांमध्ये जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घरामध्ये लाकूड न पेटविणारी गावे तयार करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

सिंहगड रस्त्यावरील भारत गॅसची श्रीराम गॅस एजन्सी आणि पानशेत रस्त्यावरील आंबी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आंबी गावातील शंभर घरांमध्ये गॅस जोडणी देण्यात आली. या कार्यक्रमात बापट बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, सरपंच पुष्पा निवंगुणे, बाळासाहेब पासलकर, तानाजी मोरे, श्रीराम गॅस एजन्सीचे मयूरेश जोशी, उदय जोशी या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, उज्ज्वला योजनेसारख्या केंद्र सरकारच्या एकशेवीस, राज्य सरकारच्या आणि जिल्ह्यच्या पंचवीस योजना आहेत. सरकारच्या या योजनांचा लाभ प्रत्येक ग्रामस्थाने घ्यायला हवा. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी एक व्यक्ती करू शकत नाही. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून त्यातूनच योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल.

ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी आपल्या गॅसच्या अनुदानातून गरजूंसाठी रक्कम उभी केली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे काम लोकसहभागातून उभे राहिले आहे. नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास या माध्यमातून थांबणार आहे, असे तापकीर यांनी सांगितले.

निवंगुणे म्हणाल्या, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आंबी गाव ९९ टक्के चूलमुक्त झाले आहे. प्रत्येक घरातील महिला सक्षम व्हावी, यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यतील ग्रामीण भागामध्ये उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून आंबी गावात शंभर जोडण्या देण्यात आल्या आहेत. आगामी काळात गरजेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्या बरोबरच इतरही गावांमध्ये ही योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.