डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज यंदा राज्यात १०२ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज कृषी विद्यापीठांच्या वेधशाळांच्या माहितीवरुन वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे. साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा अंदाज सादर केला. चार कृषी विद्यापीठांच्या वेधशाळांची माहिती घेऊन कमाल तापमान, सकाळ व दुपारची आद्र्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हा अंदाज आधारलेला आहे. या अंदाजानुसार राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होणार असून कमी दिवसांत अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय काही काळ पावसात खंडही पडू शकेल. मान्सूनच्या कालावधीत ‘एल निनो’ या वातवरणीय घटकाचा प्रभाव कमी राहणार असून जुलै महिन्यात तो आणखी कमी होईल. परंतु जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडेल असे साबळे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ांत पाऊस कमी पडतो. त्या ठिकाणी असे घडण्याची शक्यता अधिक आहे. विदर्भ व मराठवाडय़ात चांगला पाऊस अपेक्षित असून खंडाचा कालावधीही कमी असेल. ज्या ठिकाणी सरासरीच्या वर पाऊस पडण्याचा अंदाज आहे तिथे खंड कमी पडेल. कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जिथे कमी पाऊस अपेक्षित आहे तिथे पावसात खंड पडू शकतो.’’ विभाग अपेक्षित सरासरी पश्चिम विदर्भ ११६ टक्के मध्य विदर्भ ११० टक्के पूर्व विदर्भ १०७ टक्के मराठवाडा १०९ टक्के कोकण ९८ टक्के उत्तर महाराष्ट्र १०२ टक्के पश्चिम महाराष्ट्र ९७.१६ टक्के