कौटुंबिक वादानंतर कात्रज तलावात उडी घेतलेल्या आईला वाचविण्यासाठी मुलाने देखील उडी मारली. पण, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून पोलिसांना दोघांचे मृतदेह मिळाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिराबाई गेणू अवचरे (वय ६५) आणि सुभाष गेणू अवचरे (वय ४९, दोघेही रा. शिवशंभो नगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराबाई यांना दोन मुले असून त्यातील एका मुलासोबत त्यांचा वाद झाला होता. या वादानंतर मुलगा घर सोडून निघून गेला. त्यामुळे चिडलेल्या हिराबाई या मध्यरात्री एकच्या सुमारास कात्रज तलावाकडे आत्महत्या करण्यासाठी गेलय़ा. त्यांनी तलावात उडी मारली. त्यांच्या पाठीमागे मुलगा सुभाष त्यांना शोधण्यासाठी गेला होता. पण, आईने तलावात उडी मारल्यानंतर त्याने देखील त्यांना वाचविण्यासाठी तलावात उडी मारली. पण, तो आईला वाचवू शकला नाही. तसेच, त्यालाही तलावातून बाहेर पडता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस. के. शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.