खंडणीसाठी अनेक भागात अपहरणच्या घटना घडत असताना. चारचाकी वाहनाला नंबर प्लेट नाही. असा जाब विचारणार्‍या पोलिसांचे तिघांनी अपहरण केल्याची घटना घडली असून या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सचिन रानवडे, मयूर मते यांच्यासह आणखी एकजण या गुन्ह्याती आरोपी आहे. तर फिर्यादी सचिन तनपुरे हे पोलिस कर्मचारी आहेत.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील अभिरुची परिसरात सचिन तनपुरे हे कर्तव्यावर असताना. आरोपी सचिन रानवडे, मयूर मते व त्यांचा आणखी एक साथीदार हे एका चारचाकी गाडीत दारू पित असल्याचे व त्यांच्या वाहनास नंबरप्लेटही नसल्याचे त्यांना आढळून आले. या तिघांना अभिरूची पोलिस चौकीत नेण्यासाठी सचिन तनपुरे हे त्यांच्या चारचाकी बसले आणि चौकीमध्ये गाडी घेऊन चला असे सांगितले. त्यावर चालकाने काही अंतर पोलिस चौकीच्या दिशेने गाडी नेली. मात्र त्यानंतर प्रयेजा सिटी मार्गे हायवेवरून २५ ते ३० किलोमीटर दूरवर त्यांना गाडीमध्ये घेऊन गेले. एवढेच नाहीतर यादरम्यान तनपुरे यांच्या जवळील वाकीटॉकी देखील हिसकावून घेतला आणि त्यांना मारहाण केली. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना रस्त्यावरच सोडून देण्यात आले. यानंतर सचिन तनपुरे यांनी घडलेला प्रकार सांगितल्यानुसार सरकारी कामात अडथळा आणणे, अपहरण अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.