वयाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या मुलांनाच पूर्व प्राथमिक वर्गात (नर्सरी) प्रवेश देण्यात येईल, असे सांगत येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच (२०१५-२०१६) ही वयाची अट लागू केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. प्रत्यक्षात मात्र येत्या शैक्षणिक वर्षांसाठीची अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबरमध्येच पूर्ण झाल्याने हा निर्णय यावेळी लागू होणार का, याबाबत साशंकता आहे. राज्यातील पूर्वप्राथमिक शाळांमध्ये प्रवेशासाठीचे वयाचे निकष वेगवेगळे असल्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षी गोंधळ झाला होता. या पाश्र्वभूमीवर सर्व शाळांमधील प्रवेशासाठी वयाचा एकच निकष असावा, असा प्रस्ताव शिक्षण विभागाने शासनाला दिला होता. प्ले ग्रुप किंवा नर्सरी शाळांमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना प्रवेश द्यावा. ज्युनियर केजी, बालवाडी किंवा छोटय़ा गटासाठी किमान वय ४ वर्षे, सीनिअर केजी किंवा मोठय़ा गटासाठी किमान वय हे ५ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय ६ वर्षे असावे, असा अहवालही याबाबत नेमण्यात आलेल्या समितीने दिला होता. मात्र, यावर्षी फक्त पूर्वप्राथमिकच्याच वर्गासाठी वयाचा नियम लागू करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.कशी होणार अंमलबजावणी?राज्यातील खासगी शाळांची पूर्वप्राथमिक आणि पहिलीसाठीची प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांपासून वयाची अट लागू करूनही पालकांना त्याचा किती फायदा होणार? वयाचे निकष लागू केल्यानंतर सध्या प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार? त्याचप्रमाणे, राज्याचे पूर्वप्राथमिक शिक्षणाबाबतचे धोरणच अजून निश्चित नाही. गल्लोगल्ली सुरू असणाऱ्या नर्सरी शाळांवर नियंत्रण नाही, असे असताना या नियमाची अंमलबजावणी होणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.