धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. दिवसभरात नऊ हजार ४१६ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले, तर  सायंकाळनंतर चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे टेमघर धरणातून ९९० क्युसेकने, वरसगावमधून चार हजार ४४० क्युसेकने, पानशेत धरणातून ९९० क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. तर, खडकवासला धरणातून नऊ हजार ४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. सायंकाळी सहानंतर धरणक्षेत्रांत पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून चार हजार २८० क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.

चारही धरणात सध्या २९.०५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.६६ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे, तर या धरणांची एकूण क्षमता २०.१५ टीएमसी एवढी आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के भरले आहे. या धरणातून चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दरम्यान, जिल्ह्य़ातील वडज, डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, मुळशी, नीरा देवघर, भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.