-कृष्णा पांचाळ

परिस्थिती कशीही असो आपल्या मुलांनी चांगल शिकून मोठं व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांचं स्पप्न असतं. त्यात घरची अत्यंत बिकट परिस्थिती असेल तर हे मोठं आव्हानंच, मात्र असं असतानाही धडपडणारे पालकही निराळेच! पिंपरी येथील एका बापमाणसाची अशीच एक कथा आहे. आपल्या मुलीला संगणक अभियंता बनवायचं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं असून त्यासाठी हा बाप एटीएममध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करुन त्याच वेळेत लोकांची हुबेहूब चित्रे रेखाटून त्यातून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

रावसाहेब चक्रनारायण असं या ६५ वर्षीय बापमाणसाचं नाव आहे. एकाच वेळी एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक आणि चित्र रेखाटण्याचं दुहेरी काम ते सध्या करीत आहेत. आपल्या मुलीला उच्चशिक्षित करण्याचं त्यांच स्पप्न आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. रावसाहेब यांना तीन मुली आहेत. यांपैकी दोन मुलींची लग्नही त्यांनी मोठ्या थाटामाटात लाऊन दिली आहेत. त्याही सासरी सुखाने संसार करीत आहेत. तर तिसरी मुलगी रिबेका ही आता शेवटच्या वर्षात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहेत. तिच्या स्वप्नाला बळ आणि पंख देण्याचं काम तिचे वडील रावसाहेब करीत आहेत.

रावसाहेब यांचं शिक्षण जेमतेम झालं आहे. ते पुण्यात आले तेव्हा त्यांनी वेल्डर म्हणून काम करुन कुटुंबाचा गाडा चालवला. परंतू, वय वाढत गेल्याने डोळे त्यांना साथ देत नव्हते. अखेर त्यांनी एटीएममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीचा पर्याय निवडला. मुलीचं शिक्षण हे फार महत्वाचं आहे, याची जाणीव असल्याने त्यांनी रिबेकाच्या शिक्षणात खोडा येऊ दिला नाही. पुण्यातील शिवाजीनगर येथील एटीएम केंद्रावर ते सुरक्षा रक्षक म्हणून करीत असताना एकदा त्यांनी एका महिला अधिकाऱ्याचे चित्र रेखाटले, हे चित्र संबंधीत महिलेला फारच आवडले. त्यांनी रावसाहेब यांना चित्र काढण्यासाठी प्रेरित केले.

त्यानंतर रावसाहेब यांची बदली पिंपरी येथे झाली. तिथेही त्यांनी सुरक्षा रक्षक म्हणून काम करताना वक्तींची हुबेहुब चित्रे काढण्याचे काम सुरुच ठेवले. असे हुबेहुब चित्र ते अवघ्या १०० रुपयांत काढून देतात. सुरक्षा रक्षकाची १२ तासांची नोकरी केल्यानंतर त्यांच्या हातात केवळ ७ हजार रुपयेच पडतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलीचा त्यांना मोठा अभिमान आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती असतानाही ते रिबेकाला शिक्षणासबंधी काहीही कमी पडू देत नाहीत. आपल्याला मुलगा नाही याचं त्यांना आजिबात वाईट वाटत नाही, देव जे करतो ते योग्यच करतो अशी त्यांची धारणा आहे. मुलगा झाला असता तर कदाचित त्याने त्रास दिला असता. परंतु, मुली आपल्याला जीव लावतात असं रावसाहेब सांगतात. वयाच्या ६५ व्या वर्षी देखील ते जोमाने काम करीत मुलीसाठी परिस्थिशी दोन हात करीत आहेत, हे अभिमानास्पद आहे.