पुणे : जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे दहा हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड आणि रस्त्यांची दुर्दशा झाल्याने ७० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार के ला आहे. त्यामध्ये ७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. संबंधित नागरिकांना मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, ‘अतिवृष्टीमध्ये जिल्ह्य़ातील दहा हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ३१८३ हेक्टर क्षेत्रफळावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक जिरायती पिकांचे ३१३४ हेक्टर क्षेत्रफळ आहे. बागायती बाधित क्षेत्र ४९ हेक्टर आहे. ३१८ घरांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील अनेक रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल बनवण्यात आला आहे. त्यानुसार ७० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.’ दरम्यान, जिल्ह्य़ातील सात राज्य मार्ग आणि १६ जिल्हा मार्गाची दुर्दशा झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्याबाबतचाही प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असेही डॉ. कटारे यांनी सांगितले. ४०० नागरिकांचे स्थलांतर आतापर्यंत जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये भोरमधील आंबवडे आणि बालवडी, मावळातील शिरधे या गावांमधील प्रत्येकी एक रहिवासी आहे. भोरमधील कांजळे या गावातील एक तरुण बेपत्ता आहे. आतापर्यंत ४२० गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. मावळ, मुळशी आणि भोर या तालुक्यांतील ९८ कु टुंबांतील ४०० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. कटारे यांनी सांगितले.