सीबीएसईचा निर्णय

पुणे : किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) स्पष्ट केले आहे.

सीबीएसईकडून या संदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईने देशभरातील शाळांना १८ जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के  उपस्थिती असण्यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. आता सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने सीबीएसईकडून पुन्हा एकदा या संदर्भातील कार्यवाही करण्याची सूचना शाळांना देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा १ जानेवारीपासून आढावा घेऊन कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली जाईल. कमी उपस्थिती असण्यामागे आजारपण, जवळच्या व्यक्तीचे निधन, स्पर्धेतील सहभाग असे काही प्रामाणिक कारण असल्यास ते सिद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरावे ७ जानेवारीपर्यंत विभागीय कार्यालयाकडे सादर करावे लागतील. या मुदतीनंतर कोणाही विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही, असे सीबीएसईने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.