पाणीसाठा ९२ टक्क्यांवर; पानशेत, खडकवासला धरणांतील पाण्याच्या विसर्गात वाढ

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार प्रमुख धरणांच्या क्षेत्रात बुधवारी दिवसभरात पावसाने आखडता हात घेतला. परिणामी पानशेत आणि खडकवासला धरणांमधून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आलेली नाही. चारही धरणांमध्ये सध्या ९२ टक्के  पाणीसाठा झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमध्ये मिळून एकू ण २६.९० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. दिवसभरात टेमघर धरण परिसरात २० मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात प्रत्येकी आठ मि.मी., तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. पानशेत आणि खडकवासला ही धरणे १०० टक्के  भरली असून पानशेत धरणातून खडकवासला धरणात ४६५८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत ९४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात आले, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात संततधार पाऊस कायम आहे. या धरण परिसरात दिवसभरात २४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हे धरण ७७ टक्के  भरले आहे. पानशेत, खडकवासला धरणांसह जिल्ह्य़ातील वीर, आंद्रा, गुंजवणी, नाझरे आणि कळमोडी ही धरणे १०० टक्के  भरली आहेत, तर भाटघर धरण ९९ टक्के  भरले आहे. पुणे जिल्ह्य़ातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्य़ाच्या सीमेवर असलेले उजनी धरण ६० टक्के  भरले आहे.

धरणांतील पाणीसाठा टीएमसी, कं सात टक्क्यांमध्ये

टेमघर २.७३ (७३.५८), वरसगाव ११.५५ (९०.१२), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.९७ (१००), पवना ६.५५ (७७.०२), भामा आसखेड ५.८० (७५.६१), डिंभे ९.८० (७८.४६), चासकमान ५.७० (७५.२२), वीर ९.४० (१००), कळमोडी १.५१ (१००), गुंजवणी ३.६८ (१००), आंद्रा २.९२ (१००), निरा देवघर १०.४४ (८९.०३), भाटघर २३.१६ (९८.५३) आणि उजनी ३३.१० (५९.९१)