बारावीचा विषय कधी सोडवणार असा जाब वडिलांनी विचारल्याने याचा राग मनात धरून १९ वर्षीय तरुण घर सोडून निघून गेला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून शोध घेत आहेत.

नरेंद्र चौधरी (वय-१९ रा.श्रेया अपार्टमेंट, विज्ञान नगर बावधान पुणे) असं घरातून निघून गेलेल्या या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्थानकात वडिल देवाराम चौधरी (वय-४८) यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी कुटुंब हे पुण्याच्या बावधन येथे राहते. मुलगा नरेंद्र हा बारावीत एका विषयात नापास झाला होता. त्यामुळे वडिलांची चिंता वाढली होती. वारंवार सांगूनही नरेंद्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करत होता. तुझा राहिलेला विषय तू कसा आणि कधी सोडवणार असा जाब वडिलांनी विचारला. याचाच राग मनात धरून नरेंद्र ७ जुलैला राहते घर सोडून निघून गेला. त्याच्याकडे ८०० रुपये असल्याचे वडिलांनी पोलीस तक्रारीत सांगितलं आहे.

बुधवारी शोध घेऊनही मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने वडिलांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं असून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.