खडकवासला आणि पवना धरणातील पाणीसाठा ऐंशी टक्क्य़ांपेक्षा जास्त झाल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून दोन्ही धरणांतून दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे पवना, मुळा, मुळा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात चांगली वाढ झाली आहे. धरण परिसरात सोमवारी दिवसभर चांगला पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला धरणात ८९.८७ टक्के पाणीसाठा झाला असून सकाळी दहा वाजल्यापासून या धरणातून २०१२ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली. पवना धरणातील पाणीसाठा ८४.८७ टक्के झाला असून या धरणातून सकाळी २२०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे. मुळशी धरणातून ही २६७१ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ईश्वर चौधरी यांनी दिली. या धरणातून पाणी सोडल्यामुळे पवना, मुळा, मुठा नद्यांची पात्र पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागली आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ७२ टक्के पाणीसाठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणातील एकूण पाणीसाठा ७२.५० टक्के झाला आहे. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणात २० मिलीमीटर पाऊस झाला असून एकूण पाणीसाठा ५७.६० टक्के झाला आहे. तर वरसगाव येथे १७ मिलीमीटर पाऊस झाला असून या धरणातील पाणीसाठा ६५.४४ टक्के झाला आहे. पानशेत धरण परिसरात १६ मिलीमीटर पाऊस झाला असून पाणीसाठा ८२.९७ टक्के झाला आहे.