आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र, खासदार सुनील तटकरे आणि अभिनेते सुमित राघवन यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या मुंबई वृत्त विभागप्रमुख रेश्मा शिवडेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानतर्फे ११ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या ‘हास्य-विनोद-आनंद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. मॉडेल कॉलनी येथील विनोद विद्यापीठ येथे ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुराव कानडे यांनी सांगितले. प्रतिष्ठानतर्फे सौमित्र यांना कवी केशवकुमार पुरस्कार, सुमित राघवन यांना रंगकर्मी पुरस्कार, सुनील तटकरे यांना वक्ता दशसहस्र्ोषु पुरस्कार, रेश्मा शिवडेकर यांना पत्रमहर्षी पुरस्कार, उत्तरा केळकर यांना अक्षर वाङ्मय पुरस्कार, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांना शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार, शांता लागू यांना विडंबनकार पुरस्कार, सुधीर सुखटणकर यांना विनोदी लेखक पुरस्कार, प्रभाकर वाईरकर यांना व्यंगचित्रकार पुरस्कार, अभिजित देशपांडे यांना दिग्दर्शक पुरस्कार, अद्वैत दादरकर यांना नाटककार पुरस्कार मिळाला आहे.युवराज शहा यांना उद्योजक पुरस्कार, डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांना कार्यक्षम कार्यकर्ता पुरस्कार, श्रीराम पवार यांना आत्मचरित्र पुरस्कार आणि अंबुजा साळगावकर यांना हायकुकार शिरीष पै पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.