केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्यानंतर त्याबाबत देशभरात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास, महाराष्ट्रात हे विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. पुण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी कृषी विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

राज्यातील करोना सद्यस्थितीत बाबत अजित पवार म्हणाले की, एका बाजूला करोना बाधित रुग्ण आढळत आहे. तर दुसर्‍या बाजूला बरे होऊन रुग्ण घरी जाण्याची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांची आजवर पालन प्रत्येक सण उत्सवा दरम्यान केले आहे. तसेच नवरात्र आणि दसरा या सणात देखील करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याच बरोबर पुणे शहरात करोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी सद्य स्थितीला ६० दिवसांवर गेला आहे. यावेळी पुण्यात गणेश उत्सवानंतर करोना वाढला असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील मंदिरे, मशीद केव्हा सुरू होणार त्या प्रश्नावर म्हणाले की, देशभरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. राज्य सरकार प्रत्येक नागरिकाचा विचार करून निर्णय घेत आहे. प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्याने सुरू होत असून मंदिर ,मशीद ,गुरुद्वारा ,चर्च उघडावे, अशी मागणी होत आहे. आम्हाला देखील वाटते की, हे सुरू व्हावे. पण करोनाची बाधा होऊ नये, त्या दृष्टीने आपण सावधपणे टप्प्या टप्प्याने निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.