मावळातील शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे रखडलेला पिंपरी पालिकेचा बहुचर्चित पवना बंदनळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली. राजकीय हस्तक्षेप न झाल्यास पिंपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत निश्चितपणे समावेश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पवार म्हणाले, मावळ बंद नळ योजना सुरू केली, तेव्हा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला, आता भाजप सत्तेत आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे व चार महिने पवनेच्या पात्रातून रावेत येथून पाणी उचलण्याची आमची तयारी आहे. या विषयी चर्चा करण्याची आमची आजही तयारी आहे. सरकारने मध्यस्थी करावी. ‘घरकुल’ योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थीना नवीन घर योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न करू. डॉ. आनंद जगदाळे यांच्यावर आरोप असले तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची शिक्षा सौम्य करण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य आहे, सभागृहाला तसा अधिकारही आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे नेमके कोणाकडे आहेत, हे त्यांनाच विचारावे. शहर राष्ट्रवादीची कार्यकारिणी अधिवेशनानंतर जाहीर करू. प्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या कार्यकर्त्यांपैकी योग्य त्यास संधी देऊ.