राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या रोखठोक स्वभावाची चर्चा नेहमीच होत असते. त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे किस्सेही ऐकायला मिळतात. त्यांच्या तडकाफडकी स्वभावाची जाण केवळ बारामतीकरानाच आहे, असं नाही. तर महाराष्ट्रालाही आहेच. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे रविवारी बारामतीत अजित पवारांच्या जनता दरबारात घडलेला प्रसंग. एका नागरिकांना अजित पवारांना निवेदन दिलं. त्या निवेदनाशील मागणी बघून अजित पवार पटकन बोलून गेले.

रविवारी अजित पवार बारामतीत होते. बारामती मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार जनता दरबार घेतात. नेहमीप्रमाणे आजही (२५ जुलै) जनता दरबारात अनेकजण तक्रारी घेऊन आलेले होते. बारामतीमधील देसाई इस्टेट येथे हा जनता दरबार सुरू होता. लोकांच्या समस्या ऐकून घेत असताना एकाने व्यक्तीने अजित पवारांना निवदेन दिलं. या निवेदनात केलेली तक्रार वाचून अजित पवार भडकले.

काय होतं निवेदनात…

‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की, यामध्ये लक्ष घालून मला मदत करावी’, असं या व्यक्तीने निवेदनात म्हटलेलं होतं. निवेदनातील ही मागणी वाचून अजित पवार चांगलेच संतापले. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’ असं म्हणत अजित पवार यांनी त्या व्यक्तीची आपल्या नेहमीच्या शैलीत कानउघाडणी केली.

अजित पवार काय म्हणाले?

“बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. लोकांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात. नको ती कामं घेऊन माझ्याकडे येऊ नका. मुलांवर चांगले संस्कार करा. कुणी चुकीचं वागलं ना, सावकारी असो, रुपये शेकडा असे धंदे करणाऱ्यांना मी सोडणार नाही. कितीही मोठ्या बापाचा असो, मोक्का लावेन, तडीपार करेन. त्यामुळे जे कुणी बगलबच्चे असतील त्यांना सांगा, असं काही करायच्या भानगडीत पडू नका. पैशांची गुंतवणूक असो वा आर्थिक व्यवहार… हे करताना वेड्यावाकड्या सवयी असणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका”, असंही अजित पवारांनी सुनावलं.