हिंजवडीतील कंपनीमध्ये तरुणीचा खून होतो. राज्यात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. पण सरकार काहीच करत नाही. कडक नियम केले जात नाहीत, यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पिंपरीमध्ये केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचारामध्ये वाढ होते आहे. त्यांना मारून टाकण्याच्या प्रकारांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. हिंजवडीत काय घडले, एवढ्या मोठ्या कंपनीत त्या तरुणीला सुटीच्या दिवशी एकटे का बोलावले. तिच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीची आहे. त्या मुलीचे लग्न होणार होते. अशा मुलीचा अशा पद्धतीने खून होणे हे सरकारचे अपयश नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आयटी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली काम करत आहेत, त्यांच्या सुरक्षेची अंतिम जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारचीच आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले, हे सरकार सत्तेत येऊन दोन-सव्वादोन वर्षे झाली. कोपर्डीत तेच घडले. लातूरमध्ये तर पाच, सात जणांचे खून करण्यात आले. तेथील दुकानदारांना दुकान चालवणे अवघड झालंय. कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकारच अस्तित्त्वात राहिलेला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी तेथील पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त यांना जबाबदार धरले पाहिजे. सरकारने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत हा संदेश जाणार नाही. तोपर्यंत काही घडणार नाही. आम्ही सांगत राहणार आणि पत्रकार बातम्या देत राहणार. विधीमंडळात आम्ही सातत्याने कायदा-सुव्यवस्थेचा विषय उपस्थित करत आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पक्ष नेत्या मंगला कदम, योगेश बहल, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.