दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची ग्वाही

पुणे : ‘भारताच्या दक्षिणेकडील राज्यात किंवा दक्षिण द्वीपकल्पात दहशतवादी हल्ला होऊ  शकण्यासंदर्भातील माहिती गुप्तवार्ता विभागाने लष्कराला दिली आहे. भारत-पाक सीमेवरील ‘सर क्रीक’ या खाडीच्या भागात काही सोडून दिलेल्या बोटी आढळल्या आहेत. खबरदारीच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भागातील लष्करी क्षमतेत वाढ करण्यात आली आली असून शत्रूच्या योजना निष्फळ ठरवण्यासाठी लष्कर सज्ज आहे,’ अशी ग्वाही लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी सोमवारी दिली.

कान्हे येथे लष्करी विधी महाविद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचे भूमिपूजन सैनी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘सर  क्रीक भागातील दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन त्या भागात लष्कराची कुमक वाढवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. दहशतवादी संघटनांचे हल्ला करण्याचे मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. त्यामुळे सर क्रीकबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच सर क्रीकबाबत दोन्ही देशात वाद असून, त्याचा निर्णय सरकारच्या पातळीवर होईल,’असे सैनी यांनी सांगितले.

‘अपारंपरिक संघर्षांशी (सबकन्व्हेन्शनल कॉन्फ्लिक्ट) संबंधित कोणत्याही गोष्टीला अंतर्गत आणि बाह्य़ घटक कारणीभूत असतात. जम्मू काश्मीरबाबत अंतर्गत मुद्दय़ांपेक्षा बाह्य़ घटकच अधिक कारणीभूत असल्याचे दिसते. मात्र, त्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत जम्मू काश्मीरमध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी लष्कर पूर्णपणे सज्ज आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.