आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वाघाटीला मागणी आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी वाघाटी ही रानभाजी खाल्ली जाते. अनेकांना ही भाजी माहिती नसली तरी जुन्या पिढीतील अनेकांना या रानभाजीची माहिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून महात्मा फुले मंडईत वाघाटीची आवक अल्प प्रमाणात सुरू आहे आणि मंगळवारी एक किलो वाघाटीचा भाव सहाशे ते आठशे रुपये किलो असा होता. वाघाटी ही रानभाजी आहे. पुरंदर, वेल्हा भागात वाघाटीची झाडे आहेत. पेरूसारख्या दिसणारे हे फळ असून झाडाला मोठे काटे असतात. करटुलं आणि वाघाटीमध्ये फरक आहे. करटुलंच्या फळाला काटे असतात. वाघाटीचे फळ छोटय़ा पेरूसारखे दिसते. वाघाटीचे झाड डोंगररांगांवर असते. त्यामुळे या झाडाविषयी आणि त्यावर लगडणाऱ्या फळांविषयी फारशी माहिती नसते. आषाढी एकादशीचा उपवास जुन्या पिढीतील लोक वाघाटीची भाजी करून सोडायचे. पुणे जिल्हय़ात आजही आषाढी एकादशीच्या उपवास सोडण्यासाठी आवर्जून वाघाटीची भाजी करतात, अशी माहिती महात्मा फु ले मंडईतील भाजी विक्रेते रवींद्र खांदवे यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून आमच्या गाळय़ावर वाघाटीची आवक सुरू झाली आहे. वाघाटीची आवक अल्प प्रमाणात होते. पुरंदर तालुक्यातील बांदलवाडी भागातील शेतक ऱ्याने वाघाटी विक्रीसाठी पाठविली आहे. संपूर्ण बाजारात चाळीस ते पन्नास किलो एवढी वाघाटीची आवक झाली आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वाघाटीला मागणी असते. त्यानंतर आवक होत नाही. नवीन पिढीतील अनेकांना या भाजीची माहिती नाही. साधारण जून महिन्यात वाघाटीच्या झाडाला फळ येते. झाडाला काटे असल्याने वाघाटीचे फळ काढणे तसे अवघड असते. आषाढी एकादशीच्या अगोदर एक दिवस पुरंदर, वेल्हे भागातील शेतकरी पाटय़ांमधून ही भाजी मंडईत विक्रीसाठी पाठवितात. आवक कमी, मागणी जास्त रानभाजीचा भाव प्रतिकिलो सहाशे ते आठशे रुपये किलो ऐकून सामान्य ग्राहकांना आश्चर्याचा धक्का बसतो. संपूर्ण बाजारात चाळीस ते पन्नास किलो वाघाटीची आवक होते. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ही भाजी लगेचच संपते. त्यामुळे वाघाटीचे भाव जास्त असतात, असे भाजी विक्रेते रवींद्र खांदवे यांनी सांगितले.