उद्योगनगरीत नोटाबंदीनंतरही एटीएमचे दरवाजे बंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला, त्याला गुरुवारी (८ डिसेंबर) एक महिना पूर्ण होत आहे. पहिल्या काही दिवसांत उद्भवलेल्या परिस्थितीत हळूहळू फरक पडत असला तरी बँका व एटीएमपुढील रांगा कायम असल्याचे चित्र उद्योगनगरीत कायम आहे. काही बँकांच्या एटीएमचे शटरही उघडण्यात येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरूच असून दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या ठिकाणी नोटाबंदीमुळे प्रचंड त्रास होत असल्याने तसेच खर्चासाठी पैसेच उपलब्ध होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही दिवसांमध्ये बँका आणि एटीएमपुढे प्रचंड रांगा होत्या. नागरिकांमध्ये भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण होते. महिन्यानंतर थोडीफार परिस्थिती बदलली असली तरी नागरिकांच्या रांगा मात्र कायम आहेत. बँकांचे व्यवहार विस्कळीत आहेत. दररोज काम उरकताना बँक कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. सरकारकडून दररोज वेगवेगळे आदेश काढण्यात येत असल्याने संभ्रमावस्था वाढतेच आहे. बँकेत हक्काचे पैसे असूनही ते काढता येत नाहीत. दोन-चार हजार रुपये काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. गर्दीमुळे दररोज वादावादी होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना अधिक त्रास होतो आहे. दोन हजाराच्या नोटा चलनात वापरताना अडचणी येत आहेत. शे-दोनशे रुपयांची खरेदी केल्यानंतर उर्वरित पैसे परत करण्यासाठी दुकानदारांकडे सुट्टे उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. दूध, भाजी, किराणा, केशकर्तनालय, पेपरवाला, केबलवाला, गॅरेज, पानपट्टी, शाळा, रिक्षावाला आदी ठिकाणी नागरिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हातावर पोट असणाऱ्यांना जास्त त्रास जाणवतो आहे. उधारी ठेवण्याची मर्यादाही ओलांडली जाऊ लागल्याने वेगळय़ाच अडचणी उद्भवू लागल्या आहेत. हॉटेल व पेट्रोल पंपचालकांनी पहिल्या दिवसापासून असहकार पुकारला होता. काही अपवाद वगळता दोन्ही ठिकाणी नागरिकांची फरफट सुरूच आहे. ‘खाऊगल्ली’तील खवय्ये कमी झाले. चित्रपटगृहांची गर्दी ओसरली आहे. पथारीवाल्यांचा व्यवसाय निम्म्याने कमी झाला आहे. जुन्या नोटा बदलून देण्याचा काळा बाजार तेजीत असून १००० रुपयांना ८०० असा भाव असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या खिशात पैसाच उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारचा निर्णय कितीही चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याची नागरिकांची भावना झाली आहे. सद्य:स्थितीत ५० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. नोटाबंदीने फटका बसतो आहे. दोन हजाराच्या नोटा घेऊन नागरिक येतात, त्यांना सुट्टे देताना अडचणी येत आहेत. दररोज निघणारे वेगळे फतवे त्रासदायक वाटतात. - राजेंद्र सूर्यवंशी, पथारी व्यावसायिक, िपपरी नोटाबंदीमुळे अडचणी जरूर झाल्या. मात्र, गोंधळून न जाता आजही पाचशे व हजार रुपयांची नोट स्वीकारण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे. दररोजचा भरणा बँकेत जमा केला जात असल्याने अडचणी येत नाहीत, असा अनुभव आहे. अविनाश बवले, हॉटेल व्यावसायिक, मासूळकर कॉलनी