एलबीटीच्या काही तरतुदी निश्चितपणे जाचक आहेत, त्यात बदल आवश्यक आहेत. प्रामाणिक व्यापाऱ्यांना नाहक त्रास होता कामा नये, अशी भूमिका मांडतानाच नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या भावनेशी खेळण्याचे राजकारण काहीजण करतात, तो त्यांचा जुना धंदा आहे, अशी खोचक टीका ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांना उद्देशून केली.एलबीटी विरोधातील आंदोलनामुळे शहरातील कारभार पाच दिवस बंद होता, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या व्यापाऱ्यांचे नेतृत्व बाबर करत आहेत. आतापर्यंत पानसरे यांनी एलबीटीविषयी भाष्य केले नव्हते. तथापि, सोमवारी प्रथमच त्यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. पानसरे म्हणाले, एलबीटी रद्द होणार नाही, जकात पुन्हा सुरू होणार नाही. एक काहीतरी राहणारच आहे. जकात नको आणि एलबीटीही नको, असे म्हणणे चुकीचे आहे. एलबीटीतील जाचक तरतुदी रद्द करण्याची गरज आहे. ज्यांचा दररोज व्यवसाय ३००-४०० रुपयांपर्यंत होतो, त्यांना हिशेब ठेवणे वा अन्य प्रक्रिया पार पाडणे अवघड आहे. एलबीटीच्या माध्यमातून छोटय़ा व्यावसायिकांना वेठीस धरण्यात येऊ नये. ज्या गोष्टी होणारच नाहीत, त्याची मागणी करायची व वातावरण पेटवून द्यायचे, हा काहींचा धंदा आहे. किती दिवस नागरिकांच्या भावनेशी खेळणार आणि नाहकनागरिकांना वेठीस धरणार, असा मुद्दा त्यांनी बाबरांना उद्देशून मांडला. ज्यांना हिशेब दाखवायचा नाही, एलबीटी ही त्यांची अडचण आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांचे काहीच म्हणणे नसावे. बंद काळात अनेक व्यापाऱ्यांनी नाईलाजाने दुकाने बंद ठेवली होती.