बालभारतीचा पन्नास वर्षांचा प्रवास

‘कमल नमन कर..’ अशा अक्षरओळखीपासून ते मराठीतील नामवंत साहित्यिकांची ओळख करून देण्याचे काम अविरतपणे करणारी ‘बालभारती’ पन्नाशीची झाली आहे. छापील पाठय़पुस्तकांपासून सुरू झालेला प्रवास आता ‘टॉकिंग बुक्स’ निर्मितीपर्यंत पोहोचला आहे. बालभारतीला २७ जानेवारीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

शाळेत पहिले पाऊल पडल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्यांचे बालभारतीशी चिरकालीन टिकणारे नाते जुळते. प्रत्येक मुलाला दरवर्षी एका नव्या विश्वाशी ओळख करून देणारी बालभारती या संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. ये रे ये रे पावसा, उठा उठा चिऊताई. यांपासून ते अगदी अलीकडच्या साहित्यिकांची ओळख बालभारतीने भाषेच्या पाठय़पुस्तकांतून करून दिली. अनेक ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार, व्याकरणकार संस्थेशी जोडले गेले आहेत.

भाषेबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र अशा सर्व विषयातील तज्ज्ञांच्या पाठय़पुस्तक मंडळाने गेली अनेक वर्षे बालभारतीसाठी काम केले आहे. काळानुसार आता ई-बुक स्वरूपातील शैक्षणिक साहित्याची निर्मिती बालभारतीने सुरू केली. आता नव्या शैक्षणिक वर्षांत ‘टॉकिंग बुक्स’ची निर्मितीही करण्यात येणार आहे. त्यामुळे पुस्तकातील धडे वाचण्याबरोबरच ते ऐकण्याचीही संधी मुलांना मिळणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची टॉकिंग बुक्स तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती बालभारतीतील अधिकाऱ्यांनी दिली.

विस्तार किती?

दरवर्षी बालभारती साधारण ७ कोटी पाठय़पुस्तकांची छपाई करते पाठय़पुस्तकांमध्ये एकूण ४५० पुस्तकांची निर्मिती दरवर्षी केली जाते. नव्या अभ्यासक्रमाची ‘टॉकिंग बुक्स’ येणार दरवर्षी साधारण अडीच कोटी शिक्षणपूरक साहित्य, कार्यपुस्तिकांची निर्मिती करण्यात येते. अभ्यासक्रमावर आधारित ई-साहित्याची निर्मिती पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके ८ भाषा माध्यमांतून तयार होतात.

बालभारतीचा इतिहास

पहिली ते बारावीच्या पुस्तकांची निर्मिती करणारे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ असे या संस्थेचे नाव. मात्र तिची ओळख बालभारती अशीच आहे. २७ जानेवारी १९६७ रोजी बालभारतीची स्थापना झाली. पहिले पुस्तक १९७१ मध्ये प्रसिद्ध झाले. दर्जेदार शालेय पुस्तकांची निर्मिती व्हावी,  सर्व विद्यार्थ्यांना माफक दरात पाठय़पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी पाठय़पुस्तक मंडळ स्थापन करण्याची सूचना कोठारी आयोगाने केली होती. त्यानुसार राज्यात ही संस्था उभी राहिली.

‘किशोर’ची मेजवानी

पाठय़पुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना वाचनीय काही मिळावे यादृष्टीने ‘किशोर’ या मासिकाची निर्मिती बालभारतीकडून करण्यात आली. १९७३ मध्ये किशोरचा पहिला अंक प्रकाशित झाला. दर महिन्याला या मासिकाच्या साधारण ६५ हजार प्रती छापण्यात येतात, तर दिवाळी अंकाच्या १ लाखापेक्षा जास्त प्रती छापण्यात येतात.