चांदीचा वर्ख लावलेली मिठाई कितीही आकर्षक दिसत असली, तरी मिठाईवर लावल्या जाणाऱ्या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे शक्यतो चांदीचा वर्ख असलेली मिठाई टाळाच, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दिवाळी दहा दिवसांवर आल्यामुळे मिठाई बाजारात भेट देण्यासाठीचे मिठाई बॉक्स बनवण्याच्या कामांना सुरूवात होते आहे. विविधरंगी मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वर्ख ग्राहकाचे लक्ष वेधून घेत असल्यामुळे हा वर्ख या दिवसांत मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो. चांदीच्या वर्खात आयुर्वेदानुसार शरीरासाठी काही औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. योग्य प्रमाणात चांदीचा अंश पोटात गेल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तसेच अॅलर्जीकारक घटक व प्रदूषणापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी, तसेच हाडे आणि सांधे निरोगी राहण्यासाठी ती उपयुक्त ठरु शकते. अनेक औषधांमध्येही रौप्यभस्म वापरले जाते. असे असूनही या वर्खाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नसल्यामुळे तो शक्यतो मिठाईवर वापरुच नये, असे मत डॉ. संजीवनी राजवाडे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘चांदीचा वर्ख उत्कृष्ट चांदीपासून योग्य पद्धतीने बनवला गेला असेल तर तो मिठाईबरोबर पोटात गेल्यावर शरीरात सहजपणे शोषला जातो. परंतु हल्ली या वर्खात शुद्ध चांदी न वापरता अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम अशा धातूंची भेसळ झालेली असू शकते. असा भेसळयुक्त वर्ख खाल्ला गेला तर त्यापासून फायदे तर मिळत नाहीतच, पण मूत्रपिंडावर ताण येण्याची शक्यता असते. भेसळ झालेले धातूही अशुद्ध स्वरुपात असू शकतात व त्यांचे कर्करोगकारक परिणाम असू शकतात. त्यामुळे चांदीच्या वर्खाच्या शुद्धतेची खात्री असेल तर तो मिठाईवर वापरला जाऊ शकतो, पण तसे नसल्यास मात्र वर्ख शक्यतो टाळावा, अथवा कमीत- कमी वापरावा.’ चांदी व अॅल्युमिनियमच्या वर्खातला फरक कसा ओळखाल? पातळ अॅल्युमिनियम फॉईल ही चांदीच्या वर्खापेक्षा स्वस्त असल्यामुळे तीच मिठाईवर वर्खासारखी वापरली गेल्याचे एक प्रकरण यापूर्वी पुण्यात झाले होते. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले,‘चांदीचा वर्ख व अॅल्युमिनियम फॉईल ओळखण्यासाठी हा वर्ख हाताच्या दोन बोटांत घेऊन चोळावा. चांदीचा वर्ख असल्यास तो सुटा होऊन बोटांना चिकटतो, तर अॅल्युमिनियमच्या फॉईलचा बारीकसा गोळा तयार होतो.’